रत्नागिरी : जनगणना तसेच मतदार याद्यांच्या विशेष पडताळणी मोहीम या कामांची जबाबदारी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यावर देण्यात आली आहे. या दोन्ही महत्त्वाच्या शासकीय कामांसाठी कर्मचारी उपलब्ध व्हावेत म्हणून राज्य सरकारने यंदा जिल्हा परिषद कर्मचारी तसेच शिक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या रद्द केल्या आहेत. याबाबत ग्रामविकास विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे. जिल्ह्यासह राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लेखी आदेश पाठवण्यात आले आहे.
केंद्र सरकारने जनगणनेचे वेळापत्रक जाहीर केले असून राज्यात जनगणनेचा पहिला टप्पा 16 मे ते 14 जून या कालावधीत पार पडणार आहे. या दरम्यान, जिल्ह्यातील हजारो प्रगणक आणि पर्यवेक्षक प्रत्यक्ष घरांना भेटी देऊन डिजिटल पध्दतीने माहिती संकलित करणार आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेतील जनगणना तसेच एसआरआय कामाशी संबंधित ‘क’ आणि ‘ड’ वर्ग संवर्गातील कर्मचारी तसेच जिल्हा परिषद शिक्षकांची बदली न करण्याचा निर्णय घेतला आहे.
जनगणना कामाशी संबंधित ‘क ’ आणि ‘ड’ वर्ग संवर्गातील कर्मचारी तसेच सर्व शिक्षक यांची सन 2026 ची बदली प्रक्रिया राबविण्यात येवून नये असे आदेशात म्हटले आहे. जिल्हा परिषद शिक्षकांच्या दरवर्षी ऑनलाईन पध्दतीने बदल्या होतात मात्र जनगणनेमुळे यंदा शिक्षकांच्या बदल्या होणार नाहीत. या आदेशामुळे बदली मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.