दीपक कुवळेकर
रत्नागिरी : आगामी निवडणुकांमध्ये महिला मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. जिल्ह्यात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे महिला मतदार या गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये महिला वर्गाकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
शनिवारी होणाऱ्या निवडणुकांसाठी उमेदवारांची जोरदार तयारी सुरू असून महिला मतदारांना - आकर्षित करण्यासाठी विविध क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. जिल्ह्यात सर्वच पक्षांमध्ये उमेदवारीसाठी मोठी चढाओढ पहायला मिळत असून निवडणूक अटीतटीची होणार असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात महायुती तसेच महाआघाडी त्याचबरोबर अपक्ष व बंडखोर उमेदवारांचे आव्हान यामुळे राजकीय समीकरण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची धावपळ चढाओढ सुरू असून गाव, वाडी-वस्ती पातळीवर प्रचाराचा जोर वाढला आहे.
सद्य स्थितीत जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या 6 लाख 8 हजार 993 असून पुरुष मतदारांची संख्या 5 लाख 64 हजार 976 आहे. मागील निवडणुकांतील मतदान टक्केवारी पाहता महिला मतदारांचा सहभाग पुरुषांपेक्षा अधिक असतो. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये महिला मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार, यात शंका नाही. महिला मतदारांचा वाढता सहभाग लक्षात घेता यावेळी निवडणुकीत त्यांचे मतदान गेमचेंजर ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लाडकी बहीण योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण, एस. टी. प्रवासात 50 टक्के सवलत अशा शासनाच्या योजनांमुळे महिला वर्गात उत्साह वाढलेला दिसून येतो. विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेमुळे वारे फिरले होते.