रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या वाड्या, वस्त्यात, गावात पाणी टंचाई आहे. त्याठिकाणी तातडीने पाणी टँकर पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या टँकर सुरू करण्याचा एकही प्रस्ताव आलेला नाही. टँकर टंचाईचा प्रस्ताव आल्यास त्या-त्या तालुक्यात पाणी टँकर सुरू करणार, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या सीईओ वैदेही रानडे यांनी दिली.
दरवर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडूनही उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई जाणवत असते. यंदा मार्चमध्येच पाणी टंचाईस सुरुवात झाली आहे. चिपळूण, लांजासह इतर तालुक्यात पाणी टंचाईच्या तक्रारी वाढत आहे. पाणी टंचाई, टँकर विषयी सीईओ रानडे यांना विचारल्या त्या म्हणाल्या, ज्या तालुक्यात टँकरची मागणी येईल त्याठिकणी तातडीने टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. जलजीवन मिशनची कामे निधी अभावी रखडलेली आहेत. बहुतांश कामे झालेली आहेत. काही कामे अंतिम टप्प्यावर आली आहेत. 70 ते 90 कोटींचा निधी येणे अपेक्षित आहे. अद्याप निधी आलेला नाही. निधी आल्यास कामे सुरू होवून कामांना वेग येईल असेही रानडे यांनी सांगितले. शिक्षकांच्या जनगणनेसंदर्भात अद्याप तरी कोणतेही पत्रक शिक्षण विभागाला, आम्हाला आलेले नाही. पत्रक आल्यानंतर अंमलबजावणी करण्यात येईल, असेही रानडे यांनी सांगितले.
एचपीव्ही लस सुरक्षित, अफवेला बळी पडू नका
रत्नगिरी जिल्ह्यात एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस ) ही लस महाग असून तिचा तुटवडा आहे. जिल्ह्यासाठी 10 हजार 600 लस प्राप्त झाल्या आहेत. या लसीबाबत अफवा पसरवण्यात येत आहेत. 14 वर्षेवयोगटातील मुलींनी ही लस घ्यावी, ही लस सुरक्षित आणि प्रभावी आहे. कॅन्सरपासून दूर राहण्यासाठी पालकांनी मुलींना लस देण्यासाठी पुढाकार घ्यावा, शासनामार्फत ही लस मोफत देण्यात येते, असेही रानडे यांनी सांगितले.