रत्नागिरी : मे महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके हे बैठकांचा धडाका घेणार आहेत. सर्वांचेच लक्ष लागून राहिलेली सर्वसाधारण सभा ही मेअखेर रोजी होणार आहे.
सर्वसाधारण सभा ही जलजीवनची कामे, निधी, शिक्षक समायोजन, पोषण आहार, शाळादुरूस्ती, आरोग्य यासह विविध प्रश्नांवर वादळी होण्याची शक्यता आहे. तसेच १३ ते १९ मेपर्यंत स्वतंत्र पाणीपुरवठ्याची बैठक, १८ मे रोजी स्थायी समितीची बैठक, १९ मे ला जलव्यवस्थापन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
मागील चार वर्षी जिल्हा परिषदेवर प्रशासक असल्यामुळे जिल्ह्याचा विकास खुंटला होता. अखेर जिल्हा परिषदेवरील प्रशासक राज संपले असून जि.प. अध्यक्षपदी अस्मिता केंद्रे तर उपाध्यक्षपदी विलास चाळके यांची निवड झाली. तसेच विषय समिती, सदस्यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेले जिल्हा परिषद गजबजले आहे. दरम्यान, सभापती,पदाधिकारी,सदस्य आले तरी निधी अभावी कामे ठप्प झाली आहेत. विविध सभापतींनी एक तर काहींनी दोन बैठका घेतल्या आहेत.
दरम्यान, जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा कधी होणार याकडे सदस्य, पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. मे अखेर जीबी होणार आहे. तसेच पाणी टंचाई, पुरवठासंदर्भात सद्यास्थितीसाठी १३ ते १९ मे दरम्यान पाणीपुरवठा विभागाचा स्वतंत्र आढावा जि.प. अध्यक्षा केंद्रे यांच्या उपस्थितीत होणार आहे.याबैठकीत सर्व कंत्राटदार, सभापती, कर्मचारी, अधिकारी उपस्थित राहणार आहेत. १८ मे रोजी स्थायी समितीची दुसरी बैठक होईल त्यानंतर दुसऱ्या दिवशी १९ मे रोजी जलव्यवस्थापन बैठक होणार आहे. एकंदरीत मे महिन्याचे पुढील १५ दिवस बैठकांचा धडाका असणार आहे.