रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
शिवसेनेने एकहाती वर्चस्व निर्माण केलेल्या रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध पार पडली आहे. अध्यक्षपदी मंडणगड तालुक्यातील अनुभवी सदस्या अस्मिता केंद्रे यांची, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विलास चाळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी शिवसैनिकांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी काम पाहिले.
सकाळी ११ वा. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. दुपारी श्वाः विहित वेळेत अध्यक्षपदासाठी अस्मिता केंद्रे आणि उपाध्यक्षपदासाठी विलास चाळके यांचेच एकमेव अर्ज दाखल झाले. दुपारी ३ वा. अर्जाची छाननी आणि अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया झाली. दोन्ही अर्ज वैध ठरल्याने आणि विरोधात कोणीही नसल्याने निवडणूक बिनविरोध झाली.
दुपारी ३:३० वा. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोघांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली. यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोघांचेही अभिनंदन केले. नूतन अध्यक्ष अस्मिता केंद्रे या मंडणगड तालुक्यातील भिंगळोली गटातून विजयी झालेल्या अनुभवी सदस्य आहेत.
तर उपाध्यक्षपदी निवड झालेले विलास चाळके यांचा दांडगा प्रशासकीय व राजकीय अनुभव असून ते दाभोळे गटामधून विजयी झाले आहेत. चाळके यांनी यापूर्वी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून काम पाहिले असून, जिल्हा परिषदेचे शिक्षण आणि अर्थ सभापती म्हणूनही त्यांनी यशस्वी कारकीर्द भूषविली आहे.
निवड जाहीर झाल्यानंतर जि.प. आवारातील महापुरुष मंदिर आणि दत्त मंदिरात जाऊन अध्यक्ष-उपाध्यक्षांनी दर्शत घेत आशिर्वाद घेतले. अस्मिता केंद्रे यांनी ३४व्या अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. राजापूर-लांजाचे आमदार किरण सामंत, माजी आमदार राजन साळवी, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजा आमदार संजय कदम व शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला.
या निवडीनंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला असून, जिल्ह्याच्या विकासाला आता अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी केली. माजी अध्यक्ष व उबाठा शिवसेनेचे विद्यमान सदस्य विक्रांत जाधव व त्यांच्या सहकारी सदस्यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री योगेश कदम आणि आ. किरण सामंत यांनी आपल्यावर उपाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी दिली आहे. या पदावर कामकरताना शिवसेना व मित्रपक्षाच्या कार्यकर्ते व सदस्यांना न्यात देतानाच, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. शासनाच्या योजना जि.प. च्या माध्यमातून लोकापर्यत पोहचवण्याची संधी या पदाच्या माध्यमातून मिळाली असून, त्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करणार आहे.विलास चाळके, उपाध्यक्ष, जि.प. रत्नागिरी