रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील तब्बल 132 रस्त्यांची दुरवस्था झाली असून, पावसाळ्यात या मार्गावर एसटी बससेवा चालवणे धोकादायक ठरू शकते, असा अहवाल एसटी प्रशासनाने दिला आहे. या रस्त्यांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी 5 कोटी रुपयांची मागणी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली असल्याची माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा बांधकाम व आरोग्य सभापती विलास चाळके यांनी दिली.
नुकत्याच झालेल्या बांधकाम समितीच्या बैठकीत रस्ते दुरुस्तीसाठी 5 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. जून महिन्यापासून पावसाळ्याला सुरुवात होणार असल्याने ग्रामीण भागातील खड्डेमय रस्त्यांमुळे एसटी बससेवा बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक रस्त्यांची चाळण झाली असून पावसाळ्यापूर्वीच दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने होत होती.
दरम्यान, विलास चाळके यांनी बांधकाम समितीचे सभापतिपद स्वीकारल्यानंतर ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीच्या कामाला प्राधान्य दिले आहे. पावसाळ्यात बससेवा खंडित होऊ नये यासाठी त्यांनी बांधकाम विभागाकडून सविस्तर अहवाल मागवला होता. विभागाने सादर केलेल्या अहवालानुसार 132 रस्ते अत्यंत खराब अवस्थेत असून पावसाळ्यात या मार्गांवरील वाहतूक धोकादायक ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यासाठी 5 कोटी रुपयांच्या निधीची मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली असून पावसाळ्यापूर्वी आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात येतील, असेही चाळके यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील खराब रस्त्यांमध्ये चिपळूण तालुका अव्वल ठरला असून तेथे 27 रस्ते खराब अवस्थेत आहेत. दापोली तालुक्यात 19, रत्नागिरीत 16, तर संगमेश्वर आणि लांजा तालुक्यात प्रत्येकी 14 रस्ते खराब असल्याचे समोर आले आहे. सर्वात कमी खराब रस्ते राजापूर तालुक्यात असून तेथे केवळ 5 रस्त्यांची नोंद करण्यात आली आहे.