रत्नागिरी : रत्नागिरीत वाढत्या उष्मामुळे रत्नागिरीकरांच्या अंगाची लाही लाही होत आहे. दुसरीकडे ६ जूनपर्यंत जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडेल. तसेच ४० ते ५० किमी प्रतितास वादळी वारे येण्याची शक्यता मुंबईच्या हवामान खात्याने वर्तवली आहे.
जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे तात्पुरता दिलासा मिळाला. मात्र, त्यानंतर उष्मा वाढला आहे. घामाने नागरिक वैतागले आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत उकाडा जाणवत आहे. रत्नागिरीकर घरातून तोंडाला रूमाल, गॉगल घालून बाहेर पडत आहेत. दुपारी रस्त्यावरची वर्दळ कमी दिसत आहे. तर उन्हाच्या बचावासाठी लिंबू सरबत, नारळपाणी, कोकम, ताकचा आधार घेत आहेत. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा पावसाकडे आहेत. दरम्यान, जिल्ह्यात ६ जूनपर्यंत पुन्हा वादळी वाऱ्यासह मध्यम, हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.