रत्नागिरीः रत्नागिरी शहरासह लांजा, पाली, चिपळूण, संगमेश्वरसह विविध तालुक्यांत पहाटे पाचच्या सुमारास पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. विजांच्या कडकडाटासह पावसाने तासभर जोरदार बॅटिंग केली.
मागील कित्येक दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात दमट हवामान, वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. मुसळधार पावसामुळे रत्नागिरीकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. आंबा, काजू पिकांना मोठा फटका बसला आहे. शेवटच्या टप्प्यातील आंबे पावसामुळे खाली पडले, तर काहींना डागही पडले आहे. त्यामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्याला पावसाचा इशारा देण्यात येत होता. दिवसभर ढगाळ वातावरण असायचे; मात्र पाऊस पडत नव्हता. त्याचबरोबर दोन ते चार दिवसांपासून दमट हवामानामुळे उष्मा वाढला होता. घामाने नागरिक त्रस्त झाले होते. अखेर रविवारी पहाटे, सकाळच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात पेरणी होणार
रत्नागिरी जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात तब्बल ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात पेरणी, लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच नाचणीसह इतर फळपिकांचे लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी कृषी विभागाच्या वतीने नियोजन झाले आहे. शेतकऱ्यांकडूनही खरीप हंगामच्या तयारीला वेग आला आहे.