रत्नागिरी : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात रविवारी रात्री आणि सोमवारी मुसळधार पाऊस झाला. सर्वदूर धो-धो पाऊस झाल्यामुळे जनजीवन पुन्हा विस्कळीत झाले आहे. चोवीस तासांत तब्बल ९७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस दापोली, मंडणगड, खेड व चिपळुणात, तर सर्वात कमी राजापुरात पडला आहे. दरम्यान, ३० जून ते ३ जुलैपर्यंत जिल्ह्याला ऑरेंज अलर्टचा इशारा मुंबईच्या हवामान खात्याने दिला आहे.
रविवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वारा सुटला. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. कधी मुसळधार, तर कधी रिमझीम पावसाची बरसात झाली. सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, संगमेश्वर या पाच तालुक्यांत १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. त्यामुळे या ठिकाणची पाणी टंचाई दूर होण्यास मदत मिळणार आहे. पावसामुळे रत्नागिरीकर व शेतकरी सुखावले आहेत. शेतकऱ्यांकडून पेरणीला वेग आला आहे.