रत्नागिरीः जिल्ह्यात मागील चार दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. पेरणीला आता वेग आलेला आहे. जिल्ह्यातील आठही नद्यांच्या पाणी पातळी थोडी वाढ झालेली आहे. जून महिना संपत आला असून २८ जनूअखेर आतापर्यंत २ हजार ४३१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी जून महिन्यात ७ हजार ७७१ मिमी पाऊस पडला होता. गतवर्षीपेक्षा यंदा ५ हजार मिमी कमी पाऊस झाला आहे. असे असताना शनिवारी आणि रविवारी पाऊस पुन्हा गायब झालेला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत आहे.
यावर्षी पावसाने दीर्घ प्रतीक्षा करीत हजेरी लावली. जूनच्या पहिल्या आठवड्यात सलग तीन दिवस पावसाने चांगली हजेरी लावली. त्यानंतर पाऊस गायबच झाला होता. त्यामुळे शेतकरी, नागरिक चिंतेत होते. अखेर मान्सूनचे दुसऱ्या आठवड्यात पुनरागमन झाले. सलग चार दिवस पावसाने तुफान बॅटिंग केली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत २ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर भात तसेच नाचणी पिकांची पेरणी झालेली आहे. काही ठिकाणी भात लागवड ही सुरू झालेली आहे. सलग झालेल्या पावसामुळे धरण, नदीच्या पाणीपातळीत थोडीशी वाढ झालेली आहे. दरम्यान,आता पाऊस पुन्हा गायब झालेला आहे. सलग दोन दिवस कडक ऊन पडत आहे. आणखीन अशीच परिस्थिती राहिल्यास शेतकऱ्यांची पिके धोक्यात येणार आहे.
एल निनोचे सावट कायम
हवामान खात्याने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला असला तरी प्रत्यक्ष जमिनीवरील स्थिती वेगळी आहे. कडक ऊन आणि पावसाची अनपेक्षित दडी यामुळे वातावरणात एल निनोचा प्रभाव अजूनही कायम आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दुबार परेणीचे संकट
पावसाच्या भरवशावर ज्या शेतकऱ्यांनी आधीच पेरण्या उरकल्या होत्या. त्यांच्यापुढे आता दुबार पेरणीचे मोठे संकट उभे ठाकले आहे. पावसाने अशीच ओढ दिल्यास बियाणांचा खर्च वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.