रत्नागिरीला दोन महिने पुरेल इतका पाणी साठा 
रत्नागिरी

Ratnagiri News : रत्नागिरीला दोन महिने पुरेल इतका पाणी साठा

शीळ धरणातून दररोज होणार पाणीपुरवठा

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी दिवस पुरेल इतका पाणी साठा असल्याने पुढील दोन महिनेच नियमित पाणी पुरवठा केला जाणार असल्याची माहिती नगर पालिकेचे पाणी सभापती निमेश नायर यांनी सांगितले.

शहरातील पाणी पुरवठ्यासंदर्भात नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, मुख्याधिकारी वैभव गारवे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांच्या उपस्थितीत पाणी सभापती निमेश नायर यांनी रत्नागिरीकरांसाठी खुशखबर दिली. पत्रकार परिषदेत बोलताना निमेश नायर यांनी सांगितले की, धरणात दोन महिने पुरेल आणि दररोज पाणी पुरवठा सुरू राहील इतका पाणी साठा आहे. आपण अधिकाऱ्यांसह शीळ धरणाची पाहणी केली असून त्यानुसार बुधवारी धरणांत 1.679 दशलक्ष घनमीटर पाणी साठा आहे. हा पाणी साठा शहराला पुढील 70 दिवस पुरेल इतका आहे. शहराला दररोज 20 एमएलटी लागते. त्यामुळे एप्रिल आणि मेपर्यंत पुरेसे पाणी मिळणार आहे.

मागील काही दिवसात उष्णता वाढत आहे. त्यामुळे बाष्पीभवनाने पाणी पुरवठ्यावर परिणाम होणे अपेक्षित असले तरीही याच अंदाजाने दोन महिने दररोज पाणी पुरवठा होणार आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला पुन्हा पाणी साठ्याचा आढावा घेतला जाणार असल्याचे नायर यांनी स्पष्ट केले. नवीन योजना पूर्ण होऊन 2 वर्ष झाली आहेत. त्यामुळे सर्व ठिकाणी पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत आहे. किरकोळ दुरुस्तीचे कामे तातडीने केली जात आहे. रस्ते, गॅस लाईन यांची कामे आहेत. त्यामुळे पाईप लाईनमध्ये बिघाड होऊ शकतो. त्यावरही नगर पालिका कर्मचारी तातडीने उपाय करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT