रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
एप्रिल महिना संपला असून मे महिना सुरू झालेला आहे. दिवसेंदिवस पाण्याची दाहकता वाढत चालली आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात 34 हजार 295 लोकांना 17 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
लांजा, गुहागर आणि राजापूर या तीन तालुक्यांत अद्याप ही एकही टैंकर सुरू नाही. मे महिन्यात पाण्याची टंचाई आणखीन तीव्र होण्याची शक्यता आहे. मे महिना सुरू झाला असून जिल्ह्यातील नद्या, धरणातील पाणी दिवसेंदिवस आटत चालले आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
जलजीवनचे काम होऊन ही कित्येक ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. 9 तालुक्यापैकी 6 तालुक्यांत 17 टँकरने पाणपुरवठा सुरू झाला आहे. 43 गावांतील 99 वाड्यांत 3 शासकीय आणि 14 खासगी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
एकूण 170 फेऱ्या होत आहेत. सर्वाधिक पाणी टंचाई रत्नागिरी, मंडणगड, चिपळूण, खेड तालुक्यात भासत आहे. या महिन्यात पाणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणीटंचाई गांभिर्याने घ्या, योग्य नियोजन करा, असे आदेश ही पालकमंत्री उदय सामंत यांनी बैठक घेऊन दिले आहेत.