रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे घरांची पडझडबरोबरच सार्वजनिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. दरम्यान, दोन तालुक्यातील ३ शाळांची पडझड झालेली आहे. शाळांचे प्रस्ताव आल्यानंतर दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनीता शिरभाते यांनी दिली.
दहावी, बारावीचा निकाल जाहीर झाला असून सध्या सुट्ट्या सुरू आहेत. दरम्यान, येत्या १६ जूनपासून शाळांना प्रारंभ होणार आहे. तत्पूर्वी शिक्षण विभागाच्या वतीने नियोजन करण्यास सुरुवात झाली आहे. मागील दोन दिवस झालेल्या वळवाच्या पावसामुळे लांजा तालुक्यातील दोन, चिपळूणमधील एका शाळेचे नुकसान झाले आहे. शाळांवरील छप्पर उडाले तसेच कौलारू पडलेले आहेत. खिडक्या तुटलेल्या आहेत. या शाळांचा प्रस्ताव आल्यानंतर जूनपूर्वी शाळांची दुरुस्ती केली जाणार आहे. तसेच जिल्हा नियोजन समितीमधून निधी आल्यानंतर उर्वरित शाळांची दुरुस्ती केली जाणार असल्याचे माहिती शिक्षण विभागच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
जिल्ह्यातील ७६ जि.प. शाळांची होणार दुरुस्ती
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ७६ शाळांची दुरुस्ती केली जाणार आहे. आणखीन प्रस्ताव आल्यास त्याही शाळा दुरूस्ती केल्या जाणार आहेत. शाळा दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजनमधून १ कोटी ६९ लाख ९८ हजार रुपये मंजूर झाले आहेत. जूनच्या शाळा सुरू होण्यापूर्वी शाळांची इमारती दुरुस्ती होणार आहेत.