रत्नागिरी : राजापूर, संगमेश्वर तालुक्यात सुमारे ६० शिक्षकांच्या नियमबाह्य कामगिरी बदल्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. वरिष्ठांची पूर्वपरवानगी न घेता या बदल्या करण्यात आल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. या प्रकरणाची जिल्हास्तरावर चौकशी होणार असून, यांबाबत संबंधितांच्या कार्यपद्धतीचीही तपासणी होण्याची शक्यता आहे..
मिळालेल्या माहितीनुसार, कामगिरी बदली करताना विभागीय आयुक्तांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र, संबंधित प्रक्रिया न पाळता आदेश काढण्यात आल्याचा आरोप आहे. एका केंद्रातून दुसऱ्या केंद्रात करण्यात आलेल्या या बदल्यांमध्ये महामार्गालगतच्या तसेच तालुका मुख्यालयाजवळील शाळांना प्राधान्य मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. या बदल्यांबाबत शिक्षक वर्तुळातून तक्रारी करण्यात आल्या असून, काही शिक्षकांना दुर्गम भागातील शाळांऐवजी सोयीच्या ठिकाणी नियुक्ती मिळाल्याचा आरोप आहे. त्यामुळे बदल्यांमध्ये नियमांचे उल्लंघन झाले का, याबाबत चौकशीची मागणी होत आहे. या प्रक्रियेत आर्थिक देवाण-घेवाण झाल्याची चर्चाही शिक्षक वर्तुळात आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. दरम्यान, प्राप्त तक्रारींची दखल घेत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून चौकशीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
काय आहे नियम...
कामगिरी बदली हा शिक्षकांना दिला जाणारा तात्पुरता कार्यभार आहे. त्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्याने प्रस्ताव तयार करून तो शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्यामार्फत विभागीय आयुक्तांकडे पाठवणे आवश्यक असते. आयुक्तांच्या मंजुरीशिवाय बदली करता येत नाही. येथे मात्र थेट आदेश काढले गेले आहे.