रत्नागिरी : रत्नागिरीतील साईनगर सात बंगल्यामागील सूरज राजाराम झोरे खून प्रकरण दोन कारणांमुळे घडल्याचे पोलिस तपासात पुढे येत आहे. खून करणाऱ्या सोहम एकनाथ म्हात्रे याच्या प्रेयसीचे त्याच्या विरोधात कान भरणे आणि एका पार्टीत सूरजने प्रमुख संशयित सोहम म्हात्रे याच्या श्रीमुखात भडकवली होती. या दोन कारणांचा बदला म्हणून सोहमने कोयत्याने तब्बल ३१ वार केले.
गुरुवारी रात्री ९.३० ते ११ वा. च्या मुदतीत सूरज राजाराम झोरे याच्यावर संशयित सोहम म्हात्रे याने कोयत्याने सपासप ३१ वार केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित सोहम म्हात्रेसह (१८, रा. शांतीनगर, रसाळवाडी), अभिषेक राठोड (२२, आदिनाथ नगर), नजिबूल शेख (२१, रा. शांतीनगर, रसाळवाडी) यांना शहर पोलिसांनी अटक केली.
खून झालेला सूरज झोरे आणि मुख्य संशयित सोहम म्हात्रे हे मित्र होते. सूरज सोहमच्या प्रेयसीला सतत सोहमचा नाद सोडायला सांगत होता. ही माहिती सोहमला समजली होती. त्यानंतर एका पार्टीत सूरज आणि सोहमची वादावादी होऊन सूरजने सोहमच्या श्रीमुखात भडकावली होती. सूरज झोरे कामानिमित्त रत्नागिरीत आला असल्याची माहिती मिळाल्यानंतर संशयित सोहमने त्याला फोन करून साईनगर सात बंगल्याच्या मागे बोलावून घेतले. सूरज झोरे घटनास्थळी येताच संशयित सोहमने बॅगेतून कोयता काढून सूरजवर सपासप वार केले. दरम्यान, खुनातील तिन्ही संशयित आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष सहायक सरकारी वकील निलंजन नाचणकर यांनी पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने सर्व आरोपींना २ जूनपर्यंत १० दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.