रत्नागिरी : आषाढी वारीनिमित्त रत्नागिरी विभागाच्या वतीने ५० हून अधिक एसटी बसेस पंढरपूरला गेल्यामुळे जिल्हांतर्गत एसटी बसेसचे वेळापत्रक कोलमडले आहे. तसेच कित्येक फेऱ्याही रद्द करण्यात आल्या आहेत. लाडक्या लालपरीची दोन ते तीन तास वाट पहावी लागत आहे. नोकरदार, व्यापारी, विद्यार्थी, सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
आषाढी वारीनिमित्त वारकरी, भाविकांसाठी रत्नागिरी विभागाच्या वतीने जादा बसेसचे नियोजन करण्यात आले होते. तब्बल ५० हून अधिक बसेसचे बुकिंग झाले होते. सर्व बसेस पंढरपूरला गेल्या आहेत. त्यामुळे जिल्हांतर्गत एसटी सेवेचा बोजवारा उडाला आहे. विविध आगारातून रत्नागिरीला जाण्यासाठी बसेस वेळेवर येत नाहीत. तर रत्नागिरीतून लांजा, राजापूर, चिपळूण, देवरूखसह विविध तालुक्याला जाण्यासाठी बसेस उशिरा येत आहेत. प्रवाशांना दोन ते तीन तास वाट पहावी लागत आहे.
सकाळी, दुपारी, सायंकाळी तिन्ही सत्रात अशीच स्थिती आहे. त्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. बसेस पंढरपूरला गेले असले तरी जिल्हांतर्गत बससेवेचे वेळापत्रक दुरुस्ती करणे गरजेचे होते, असेही प्रवाशांनी सांगितले. प्रवाशांना नाईलाजास्तव जास्तीचे पैसे देऊन खासगी वडाप, मिनीबस, चारचाकीने रत्नागिरी गाठावी लागत आहे.