रत्नागिरी: रत्नागिरी विभागातील एसटी बसेसचे वेळापत्रक वारंवार विस्कळीत होत आहे. विशेष म्हणजे महिनाभरात तब्बल ४८ राजमाता जिजाऊ बसेस येऊनही परिस्थिती जैसे थे आहे. लांजा, राजापूर, चिपळूण त्याचबरोबर जिल्हा अंतर्गत ग्रामीण भागातील कित्येक मार्गावर बसेस वेळेवर येत नसल्याचा संताप नोकरदार, कामगार व्यवसायिक व विद्यार्थी, सर्वसामान्य प्रवाशांकडून वारंवार व्यक्त होत आहे. लांजा, राजापूर या मार्गावरून रत्नागिरीकडे तसेच रत्नागिरीतून पुन्हा त्याच मार्गावर सकाळच्या सत्रात बसेसला तासन तास उशीर होत आहे.
रत्नागिरी विभागात पूर्वी सणासुदीत किंवा उन्हाळी हंगामात एसटी बसेस गाड्या लांब पल्ल्याच्या अंतरावर गेल्यामुळे एसटी बसेसचे वेळापत्रक विस्कळीत होत असते. मात्र ऑफ सीजन असूनही अद्याप एसटीचे वेळापत्रक कोलमडलेलेच आहे. त्यामुळे जिल्हांतर्गत प्रवास करणाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. विशेषतः सकाळी, सायंकाळच्या सुमारास याचा त्रास सर्वाधिक होत आहे. राजापुरातून सुटणाऱ्या गाड्या उशिरा लांजा, रत्नागिरीत येत आहेत.
नोकरदार, व्यापारी, सामान्य प्रवाशांना तासन्तास बसेसची वाट पहावी लागत आहे. विशेषतः लांजा, राजापूर मार्गावरील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून याकडे एसटी विभाग नियंत्रकांनी लक्ष द्यावे अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.
राजापूर स्थानक प्रमुखांची उद्धट भाषा
गुरुवारी सकाळी सव्वाआठ वाजता राजापूर सुटणारी राजापूर-रत्नागिरी ही बस लांजा बस स्थानकात सव्वानऊ ते साडेनऊला येणे अपेक्षित आहे. मात्र ही बस आलीच नाही. तासनतास प्रवासी बसची वाट पाहत होते. राजापूर स्थानक प्रमुख स्वप्निल कदम यांना संपर्क करून तक्रार केली असता उलट प्रवाशांनाच उद्धट भाषा वापरली जात आहे.
यापूर्वी राजापूर बस स्थानकातून अधिकारी व्यवस्थित बोलत नसल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी प्रवासी करीत आहेत. एसटी बसेसचा विस्कळीतपणा व अधिकाऱ्यावर कारवाई संदर्भात वारंवार संपर्क करूनसुद्धा विभाग नियंत्रक जानराव यांनी फोन घेतला नाही.
विभाग नियंत्रक कारवाई करणार का?
रत्नागिरी विभागातील कित्येक चालक-वाहक मध्य पिऊन कामावर येत असल्याच्या तक्रारी वाढत आहे. काही दिवसापूर्वी चालक विना खेड तालुक्यात बस निघाली. सुदैवाने तिथे जीवितहानी झाली नाही. दोन दिवसापूर्वी निवळी मार्गावर पास असूनसुद्धा चालक-वाहकाने विद्यार्थ्यांना बसमधून खाली उतरवले, प्रवासना चालक व वाहक वाद घालत आहेत, किरकोळ शाब्दिक चकमक होत आहे. यासह अनेक घटना घडल्या आहेत यावर विभाग नियंत्रक अश्वजीत जानराव अद्याप कारवाई केली नाही. त्यामुळे यावर कारवाई व्हावी अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.
राजापूर डेपोतून सकाळी सव्वानऊ वाजता येणारी बस लांजा बस स्थानकात आलीच नाही. तब्बल तासभर नंतर साडेदहा वाजता राजापूर- रत्नागिरी गाडी आली. कामाला जायला उशीर झाला. नोकरदार, व्यापारी, शाळकरी प्रवाशांचा विचार केला पाहिजे. कमी गाड्या सोडण्यात येत असल्यामुळे दीड ते २ तास उभे राहून प्रवास करावा लागत आहे. बसेस वेळेवर येत नाहीत. एसटी विभागाने याचे नियोजन करणे अपेक्षित आहे.
- किरण माने, प्रवासी
जिल्ह्यांतर्गत मार्गावर शिवशाही, स्लीपर बसेस का?
रत्नागिरी विभागात सध्या ढिसाळ कारभार सुरू आहे. जिल्हांतर्गत रत्नागिरी- राजापूर, राजापूर-रत्नागिरी मार्गावर स्लीपर बसेस सोडण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांना जास्तीचे पैसे द्यावे लागत आहे. ज्यांच्याकडे पास आहे, एसटीत चढू देत नाही. नाईलाजास्तव बस सोडावी लागते. काही वेळेला मालवणातून शिवशाही बस होते. त्यालाही पास चालत नाही जास्तीचे पैसे देऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे जिल्हा अंतर्गत मार्गावर साध्या बसेस सोडावेत होत आहे. अशी मागणी प्रवासामधून होत आहे.