रेल्वेत सापडलेले 53 लाखांचे सामान केले परत 
रत्नागिरी

Ratnagiri News : रेल्वेत सापडलेले 53 लाखांचे सामान केले परत

कोकण रेल्वे सुरक्षा बलाच्या नन्हे फरिश्ते मोहिमेंतर्गत 30 मुलांना दिले पालकांच्या ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या मार्गावर कार्यरत असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी गेल्या वर्षभरात चमकदार कामगिरी करताना प्रवासादरम्यान रेल्वेमध्ये विसरलेले तब्बल 53 लाख 6 हजार रुपयांचे सामान प्रवाशांना परत केले आहे. तसेच तब्बल 30 हरवलेल्या मुलांना त्यांच्या आई-वडिलांकडे सुखरूप पोहोचवण्याची कामगिरीही पार पाडली आहे.

कोकण रेल्वेच्या मार्गावर दिवसभरात तीस हून अधिक ट्रेन धावतात. या ट्रेन मधील प्रवाशांची आणि त्यांच्या सामानाच्या सुरक्षिततेची जबाबदारी असते ती रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांवरती, मार्गावर चोवीस तास धावणाऱ्या गाड्यांमध्ये आणि प्लॅटफॉर्मवर रेल्वे सुरक्षा बलाचे जवान गस्त घालतात आणि लोकांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी उचलतात. कोकण रेल्वेच्या मार्गावर धावणाऱ्या ट्रेन मध्ये अनेक वेळा प्रवासी उतरताना आपले सामान विसरून जातात. गेल्या वर्षभरात कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागात अशा 141घटना समोर आल्या आहेत. या सगळ्या घटनांमधून कोकण रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने तब्बल 53लाख 6हजार776 रुपयांचे सामान, मौल्यवन वस्तू प्रवाश्यांना परत मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे.

रेल्वे प्रवासात अनेक वेळा लहान मुले हरवतात किंवा विविध भागातून चुकून या मार्गावरील रेल्वेत चढतात. अशा तीस मुलांना त्यांच्या आई वडिलांपर्यंत सुरक्षित पोहोचवण्याचे काम गेल्या वर्षभरात रेल्वे सुरक्षा बलाने केले आहे. यात26 मुलगे आणि चार मुलींचा सहभाग आहे. ऑपरेशन नन्हे फरीस्ते अंतर्गत ही कामगिरी करण्यात आली आहे. प्रवाशांची सुरक्षितता सांभाळताना प्रवासात चुकीचे वर्तन करून इतर प्रवाशांना त्रास देणाऱ्या व्यक्ती हि अनेक असतात. गेल्या वर्षभरात विनाकारण ट्रेनची चेन खेचून रेल्वे प्रवास विस्कळीत करणाऱ्या 75जणांवर कारवाई करत रेल्वे सुरक्षा बलाने 48000 रुपयांचा दंड वसूल केला आहे. गोव्यातून कोकण रेल्वेच्या माध्यमातून नेल्या जाणाऱ्या अवैध दारू वाहतुकीवर ही रेल्वे सुरक्षा बलाची नजर असते. गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या ट्रेन्स मधून 38वेळा अवैध दारू पकडली गेली असून रेल्वे सुरक्षा बलाने 5लाख 72हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याप्रकरणात आरोपींना ताब्यात घेण्यात हि यश आले. कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागात प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी तैनात असलेल्या रेल्वे सुरक्षा बला कडून रेल्वे ॲक्ट अंतर्गत विविध 645 गुन्हे दाखल केले गेले असून 5 लाख 76 हजार रुपयांचा दंड करताना दहा आरोपींना स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT