Pahalgam terror attack
रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या अमानवी कृत्याचा निषेध करण्यासाठी मराठी पत्रकार परिषद, रत्नागिरी यांच्या वतीने शनिवारी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी अधिकारी आणि शेकडो संख्येने रत्नागिरीकरांनी एकत्र येत श्रद्धांजली वाहिली. ही शोकसभा सावरकर नाट्यगृह प्रांगणात पार पडली.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला. ही अतिशय गंभीर बाब असून या विरोधात आपण सर्वांनी अशीच एकजुट दाखवण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण सर्व लोक नागरिक म्हणून एका छताखाली आलो आहोत, हीच आपली एकीची ताकद असल्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले.
तसेच यावेळी कर्नल प्रशांत चतुर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, तहसीलदार राजाराम म्हात्रे, बशीर मुर्तुजा, राहुल पंडित, बिपीन बंदरकर, वाहन निरीक्षक आरटीओ कार्यालय, माजी सैनिक, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, सर्व राजकीय पदाधिकारी, मेडिकल कॉलेज विद्यार्थी, जिल्हा शासकीय रुग्णालय नर्सिंग कॉलेज विद्यार्थी आणि शेकडो संख्येने रत्नागिरीकर उपस्थित होते. भारत माता की जय, वंदे मातरम् च्या घोषणा देत याठिकाणी काश्मीर हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मराठी पत्रकार परिषद रत्नागिरी संपूर्ण टीम उपस्थित होती.
पालघर येथील पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मंत्री उदय सामंत हे शोकसभेला उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी ऑनलाईनद्वारे स्क्रीनवरून रत्नागिरीकरांच्या एकजुटीचे कौतुक केले. दहशतवादी हल्ल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी शत्रूंना करारा जबाब दिला आहे. पुढील कारवाईसाठी सरकार प्रयत्न करीत आहे. दहशतवादी भ्याड हल्ल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र एकजूट झाला आणि येथील पर्यटकांना आणण्यासाठी प्रयत्न केले. सर्वपक्षीय राजकीय नेतेही एकत्र आले. त्यामुळे आता पाकिस्तानला अद्दल घडल्याशिवाय सरकार गप्प बसणार नाही, असे मनोगत यावेळी ऑनलाईन द्वारे मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.