पावस : रत्नागिरी तालुक्यातील पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पावस आणि गणेशगुळे परिसरात चार दिवसांच्या खंडानंतर अखेर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून या भागातील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. परिणामी शेतकरी, प्रक्रिया उद्योजक आणि पर्यटन व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. वीज नसल्याने मोबाईल सेवाही अनेक ठिकाणी खंडित झाली होती.दरम्यान, काही प्रक्रिया उद्योजकांनी जनरेटरच्या साहाय्याने मर्यादित प्रमाणात व्यवसाय सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रत्येक वेळी जनरेटरच्या सहाय्याने आंबा, काजू आणि फणस प्रक्रिया करणे परवडणारे नसल्याने व्यावसायिक अडचणीत आले होते. गरे तळणी, आंबापोळी आणि आंबा मावा तयार करण्याच्या कामातही मोठा अडथळा निर्माण झाला होता.प्रसाद तथा बाबा तोडणकर यांनी या प्रश्नाबाबत नेताजी पाटील तसेच नंदा मुरकर यांच्याशी संपर्क साधून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. त्यानंतर संबंधित ठेकेदाराचे कामगार घटनास्थळी दाखल झाले.
वादळात पडलेल्या वीजखांबाच्या परिसरात ग्रामस्थांनी साफसफाई करून जागा उपलब्ध करून दिली. त्यानंतर नवीन खांब उभारण्यात आला आणि चार दिवसांनंतर गणेशगुळे परिसरातील वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला. त्यामुळे ग्रामस्थ आणि व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले.