रत्नागिरी : रत्नागिरी शहर, पाली, संगमेश्वरसह इतर ठिकाणी सलग दुसऱ्यांदा पावसाने हजेरी लावली आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह संगमेश्वर तालुक्यातील निवे बुद्रुक, तुळसणी आणि देवरूख परिसरात पाऊस झाला. त्यामुळे आंबा बागायतदारांचे प्रचंड नुकसान झाले.
मागील काहीच दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह वळवाचा पाऊस झाला होता. त्यानंतर बुधवारी पुन्हा पावसाने हजेरी लावल्यामुळे आंबा बागायतदार धास्तावले आहेत. पावसामुळे बागांमध्ये आंब्याचा अक्षरशः सडा पडलेला असून मोठे नुकसान झाले आहे. आधीच यंदा आंब्याचे उत्पन्न कमी, त्यात पुन्हा पावसामुळे हातातोंडाशी घास आलेला वाया जात आहे. त्यामुळे आंबा बागायतदार चिंतेत आहेत. येत्या काही दिवसांत पावसाची शक्यता तसेच ढगाळ वातावरण राहणार आहे. बागायतदारांनी आंबा काढून सुरक्षित साठवावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आले.
गुरुवारपासून ढगाळ वातावरण, मात्र उकाडा कायम
रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासून दिवसभर ढगाळ वातावरण दिसून आले. मात्र उकाडा कायम होता, घामाने रत्नागिरीकर हैराण झाले होते. एरव्ही वाढत्या उन्हामुळे रस्त्यावरील गर्दी कमी व्हायची मात्र ढगाळ वातावरणामुळे वाहनांची रेलचेल दिसून आली.