राजापूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर ओणी (ता. राजापूर) येथे दोन आयशर ट्रकच्या भीषण अपघातात कुडाळ येथील दत्तप्रसाद परुळेकर यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी पहाटे साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, दत्तप्रसाद परुळेकर हे सहकारी वीरेंद्र सावंत यांच्यासोबत आंबे घेऊन मुंबईला गेले होते. आंब्याची वाहतूक पूर्ण करून ते सिंधुदुर्गकडे परतत असताना ओणी पुलाजवळ त्यांनी लघुशंकेसाठी आयशर ट्रक रस्त्याच्या कडेला इंडिकेटर देऊन थांबवला होता. याचवेळी मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या भरधाव आयशर ट्रकने (चालक गोविंद कांबळी, रा. शिरोळा, जि. सिंधुदुर्ग) थांबलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेत दत्तप्रसाद परुळेकर यांना जबर मार बसून ते फरपटत पुढे गेले. गंभीर जखमी झालेल्या परुळेकर यांना उपचारासाठी राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातात वीरेंद्र सावंत यांना कोणतीही दुखापत झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलिस निरीक्षक अमित यादव, पोलिस शिपाई नरेश गुरव, नितीन घोगले तसेच पोलिस हवालदार प्रसाद शिवलकर यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व मदतकार्य केले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अमित यादव करत आहेत.