पुढारी वृत्तसेवा : विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी त्याचबरोबर सामाजिक व भावनिक कौशल्य विकसित करण्यासाठी महिन्यातून एकदा 'दप्तरविना शाळा' उपक्रमाला पहिली सुरुवात रत्नागिरी तालुक्यातील जांभरुण क्र. १ शाळेने केली आहे. Ratnagiri News
महिन्यातून एकदा 'दप्तरविना शाळा' उपक्रम यावेळी प्रश्नमंजूषा, विविध स्पर्धा, नावीन्यपूर्ण खेळ आदी उपक्रम राबवण्यात आले. राज्यातील इयत्ता पाहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम रहावे, विद्यार्थ्यांना कला, क्रीडा या प्रकारांचा आनंद घेता यावा यासाठी आठवड्यातील शनिवारी आनंददायी दिवस राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्तन व जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी,सहकारी वृत्ती, नेतृत्व गुणांचा विकास व्हावा या हेतूने राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या अंतर्गत एक भाग म्हणून जांभरुण नंबर एक शाळेत आनापान सती, योगासने, उभे व बैठे व्यायाम खेळ, रस्सीखेच, प्रश्नमंजूषा हे उपक्रम घेण्यात आले. सडये केंद्राचे प्रमुख अमर घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राजेश पवार व संतोष रावणंग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी राजू कोकणी, कोतवाल यांनी मेहनत घेतली. या उपक्रमाचे शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष अजित सावंत, सरपंच गौतम सावंत, उपसरपंच थेराडे यांनी कौतुक केले आहे.