रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथील जेएसडब्ल्यू पोर्टच्या बी-५ परिसरातील कोल शेडचे काम करत असताना सुमारे ४५ मीटर उंचीवरून पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना १३ जून सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. राजकुमार बालेश्वर सिंग ( ३७, रा. सेमरा, अनुग्रहनगर सिवान, बिहार) असे मृत झालेल्या कामगाराचे नाव आहे.
राजकुमार हा जेएसडब्ल्यू पोर्ट बी-५ येथे लोखंडी कोल शेडवर काम करत होता. कामाची वेळ संपल्यानंतर इतर कामगारांसह खाली उतरत असताना त्याने आपल्या शरिरावर लावलेल्या सेफ्टी हुकचा वापर करत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र हुक बदलताना तो योग्यरीत्या न अडकल्याने त्याचे पाऊल फायबरच्या पत्र्यावर पडले. वजनाने फायबरचा पत्रा तुटल्याने राजकुमार सुमारे ४५ मीटर उंचीवरून थेट जमिनीवर कोसळला. या अपघातात त्याच्या हात, पोट व पायांना गंभीर दुखापत झाली आणि तो बेशुद्धावस्थेत गेला . सहकारी तसेच कंपनी व्यवस्थापनाने त्याला तातडीने उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटद-खंडाळा येथे दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सायंकाळी ६.४५ वाजता तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.