रत्नागिरी : तालुक्यातील भगवतीनगर-निवेंडी येथे विहिरीत पडून तीन वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सायंकाळी घडली. स्वरा स्वप्नेश जाधव (वय ३, रा. नागाव विशाल कंपाऊंड चाळ, दहिसर, ठाणे) असे मृत बालिकेचे नाव आहे.
स्वरा आपल्या आई श्वेता जाधव व इतर मित्र-मैत्रिणींसोबत देवदर्शन व पर्यटनासाठी भगवतीनगर-निवेंडी येथे आली होती. सायंकाळी ती इतर मुलांसोबत खेळत असताना अचानक बेपत्ता झाली. तिचा शोध घेत असताना श्वेता जाधव यांनी जवळील विहिरीत पाहिले असता, स्वरा पाण्यावर उपड्या अवस्थेत तरंगताना दिसून आली. यानंतर राहुल कैलास पाटील व इतरांनी दोरीच्या साहाय्याने तिला विहिरीतून बाहेर काढले. त्यावेळी ती बेशुद्ध अवस्थेत होती. तिला तातडीने सीपीआर देऊन प्राथमिक आरोग्य केंद्र, मालगुंड येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. याप्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.