गणपतीपुळे : पावसाळ्यामध्ये वेगवान वाऱ्यांमुळे समुद्र खवळलेला असून उधाणामुळे उंचच उंच लाटा उसळत आहेत. त्यामुळे समुद्राची धोकादायक स्थिती लक्षात घेऊन गणपतीपुळे ग्रामपंचायतीने गुरुवारपासून गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर मोठी दोरी बांधून पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यावर उतरण्यास बंदी घातली आहे. याबाबत गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या प्रशासक कल्पना पकये यांनी माहिती दिली.
पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आम्ही सूचनेचे पालन केले असून गणपतीपुळे समुद्रकिनारा हा धोकादायक स्थितीत असल्याचे लक्षात घेऊन समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांनी उतरू नये यासाठी संपूर्ण समुद्रकिनाऱ्यावर मोठी दोरी बांधली आहे. त्यामुळे पर्यटकांनी समुद्रातील पाण्यात उतरू नये, अशी स्पष्ट ताकीद प्रशासनाने दिली आहे.