रत्नागिरी जिल्‍ह्यातील नद्यांची पाणी पातळी खालावतेय! 
रत्नागिरी

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्‍ह्यातील नद्यांची पाणी पातळी खालावतेय!

जगबुडी, काजळी नदीत सर्वाधिक पाणी; उर्वरित नद्यांची पाणी पातळी शून्‍यावर; गतवर्षी २ जूनपर्यंत सरासरी ११.६१ मि.मी.पावसाची नोंद

पुढारी वृत्तसेवा

रत्‍नागिरी : वाढत्‍या तापमानामुळे रत्‍नागिरी जिल्‍ह्यातील नद्यांची पाणी पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. जिल्‍ह्यातील जगबुडी, काजळी नदी वगळता उर्वरित सर्व नद्यांची पाणी पातळी शून्‍यावर आली आहे. अशीच परिस्‍थिती असेल तर ऐन पावसाळ्यात पाण्याची टंचाई भासण्याची शक्‍यता आहे. दरम्‍यान, जून महिना सुरू झाला असून अद्याप म्‍हणावा तसा पाऊस झालेला नाही. मागील वर्षी 1 व 2 जूनपर्यंत सरासरी 11.61 पावसाची नोंद झाली होती. तर यंदाच्‍या वर्षी केवळ 0.55 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

रत्‍नागिरी जिल्‍ह्यात मागील वर्षी मे महिन्‍याच्या 18 तारखेपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली. आठ दिवसांत एक महिन्‍याचा धो धो पाऊस झाला. मान्‍सून पूर्व, मान्‍सूनच्‍या पावसाने तर जिल्‍ह्याला झोडपून काढले होते. मात्र, यंदाच्‍या वर्षी परिस्‍थिती उलटी झाली आहे. जून महिना सुरू झाला; परंतु अद्याप म्‍हणावा तसा पाऊस झालेला नाही. उलट दमट हवामान, जिल्‍ह्याचे तापमान 36 अंशापर्यंत जात आहे. त्‍यामुळे जिल्‍ह्यातील नदी, धरणातील पाण्याची पातळी पूर्णपणे खालावत आहे. ग्रामीण भागात पाणी टंचाईमुळे तब्‍बल 18 टँकरने वाड्या, गावात पाणीपुरवठा सुरू आहे.

तसेच दुसरीकडे खेड येथील जगबुडी नदीत 3.25 मीटर तर लांजा येथील काजळी नदीत 11.30 मीटर इतके पाणीसाठा शिल्‍लक आहे. उर्वरित सोनवी, मुचकुंदी, शास्‍त्री नदीची पातळी शुन्‍यावर गेली तर वशिष्ठी, कोदवली, बावनदीत एक ते दीड टक्‍के पाणीसाठा शिल्‍लक आहे. जर आणखी अशीच परिस्थिती काही दिवस राहिल्‍यास नद्यांची पाणीपातळी पूर्ण कमी होईल. पाण्याची टंचाई भासण्याची शक्‍यता आहे. पाऊस वेळेत झाल्‍यास नद्यातील पाणी पातळी वाढेल असेही सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT