रत्नागिरी : शहराजवळील राजीवडा खाडी मुखाशी मच्छीमारांना जीव मुठीत घेऊन नौका ने-आण करावी लागत आहे. तांडेलला पाण्याचा अंदाज न आल्याने राजिवड्यातील मच्छीमारी नौका बुधवारी खाडी मुखातील गाळामध्ये अडकली. सकाळी अडकलेली ही नौका दुपारी समुद्राच्या भरतीच्या लाटांमुळे निघाली. त्यामुळे चार तास या मच्छीमारांचा जीव टांगणीला लागला होता.
राजिवडा येथील खाडीतील गाळ काढण्यासाठी १४३ कोटी ९६ लाख ८१ हजार ३५५ रुपये इतका निधी मंजूर झालेला आहे. मंजूर झालेल्या कामातून या खाडीमुखातील गाळ लवकरात लवकर काढून मच्छीमारांना ये-जा करण्यासाठी चॅनल तयार करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. परंतु आता पावसाळा सुरू होणार असल्याने आणि विधान परिषदेची आचारसंहिता लागल्याने निधी उपलब्ध असूनही या कामाला मुहूर्त मिळालेला नाही.
अनेक वर्षापासून राजीवडा भागातील मच्छीमारांना गाळात रुतलेल्या खाडीतूनच भरतीची वाट पाहून वाट काढावी लागत आहे. या खाडीच्या मुखाजवळ 'ब्रेक वॉटर वॉल ग्रोयान्स टाईप' बंधारा बांधणे आणि खाडीतील गाळ काढणे या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या कामासाठी १४३ कोटी, ९६ लाख, ८१ हजार, ३५५ रुपये इतक्या खर्चाचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते राजीवडा (ता. रत्नागिरी) येथे खाडी मुखाजवळ ब्रेक वॉटर वॉल ग्रोयान्स टाईप बंधारा बांधणे व खाडी मुखाजवळ गाळ काढणे' या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने २०२२-२३ च्या राज्य दरसूचिवर आधारित अंदाजपत्रक तयार केले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने या अंदाजपत्रकाची तपासणी केली आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च रु. १४३.९७ कोटी इतका आहे.
या मंजूर कामाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे मासेमारीचा यंदाचा हंगाम संपला तरी गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. त्यातच आता आचारसंहिता लागल्यामुळे गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ होताना कठीण बनले आहे. त्यामुळे पुढील मच्छीमारी हंगामातच गाळ उपशाच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून मच्छीमारांमधून संताप व्यक्त होत आहे.