देवरुख : मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या व दर्जाहीन कामाचा फटका वाहन चालकांना बसत आहे. संगमेश्वरजवळील माभळे गावच्या हद्दीत महामार्गाचा एक मोठा भाग खचला आहे.
महामार्गाच्या कडेला असलेल्या डांबरी रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. रस्त्याचा बाजूचा भाग (शोल्डर) खचून खाली सरकला आहे. या खचलेल्या भागामुळे बाजूला असलेल्या दरीसारख्या उताराकडे रस्ता आणखी खचण्याची भीती निर्माण झाली आहे. पावसाचा जोर वाढल्यास हा संपूर्ण रस्ता वाहून जाण्याचा किंवा खचण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे. रस्त्याच्या कडेला भराव टाकून करण्यात आलेले काम पहिल्याच काही दिवसांत उघडे पडले आहे. महामार्गावरून २४ तास जड वाहनांची आणि प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. अशा परिस्थितीत हा खचलेला रस्ता रात्रीच्या वेळी एखाद्या अपघाताला कारणीभूत ठरू शकतो. या भागातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा पावसामुळे दृश्यमानता कमी असताना या परिसरातून वाहने धीम्या गतीने चालवावीत, असे आवाहन केले आहे.