देवगड : १ जून हा एस्टीचा ७८ वा वाढदिवस असल्याने राज्यातील सर्व आगाराच्या कंपाऊंडलगत ७८ हजार झाडे लावण्याचा संकल्प असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. परिवहन मंत्र्यांनी देवगड आगाराला भेट देवून पाहणी केली. यावेळी प्रवासी व नागरिकांतून समस्यांचा पाढा मंत्र्यांसमोर वाचला. यावर समस्यांचे निराकरण केल्याचा अहवाल तत्काळ द्या अन्यथा निलंबनाची कारवाई करण्यात येईल असा सज्जड दम ना.सरनाईक यांनी विभाग नियंत्रक व अधिकाऱ्यांना दिला. एस्टी स्थानकांच्या स्वच्छतेबद्दल व इतर समस्यांबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. एस्टी स्थानकांच्या स्वच्छतेसाठी यांत्रिक झाडू संकल्पना राबविणार असल्याचे ना. सरनाईक यांनी सांगितले.
मंत्री प्रताप सरनाईक यांनी रविवारी दुपारी देवगड बसस्थानकाला भेट दिली त्यांचासमवेत माजी आ. राजन तेली, शिवसेना नेते संजय आग्रे, संदेश पटेल, तालुकाप्रमुख विलास साळसकर, उपसभापती अमोल लोके, विभाग नियंत्रक दीपक घोडे, पं.स.सदस्या सौ. सलोनी तळवडेकर, यंत्र अभियंता पांडूरंग वाघमोडे, आगारव्यवस्थापक सौरभ औंधकर, स्थानकप्रमुख श्रीकांत सैतवडेकर आदी अधिकारी व कर्मचारी तसेच एस्टीच्या विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
स्वच्छतागृहाची पाहणी व नाराजी
ना. सरनाईक यांनी बसस्थानकामधील सुलभ शौचालयाची पाहणी केली. तेथे कार्यरत स्वच्छता कर्मचाऱ्यांना पाहून, मंत्री आले म्हणून स्वच्छेतेचे काम सुरू आहे का? असा सवाल त्यांनी विभाग नियंत्रकांना केला. एस्टी स्थानकांच्या स्वच्छतेवर भर द्या. बैठक व्यवस्था, नवीन पंखे, पिण्याचे पाणी, प्रवाशांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्या, अशा सूचना त्यांनी दिल्या. संपूर्ण बसस्थानकाची पाहणी करून स्थानकामधील बुक व पेपर स्टॉलवर जावून स्टॉलधारकांशीही संवाद साधत त्यांचा समस्याही जाणुन घेतल्या.
एसटी कर्मचाऱ्यांच्याही समस्या घेतल्या जाणून
एस्टी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी ना.सरनाईक यांच्यासमोर आपल्या समस्या मांडून निवेदन दिले. कर्मचाऱ्यांची कमतरता व गाड्यांची अवस्था यावरही मंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी त्यांनी एस्टीच्या ताफ्यात आता इलेक्ट्रीक बस देण्यावर भर असून नवीन गाड्या देताना त्या इलेक्ट्रीक बसेस देण्यात येणार असल्याचे सांगितले .कर्मचाऱ्यांची नवीन भरतीप्रक्रिया करण्यात येणार असून सीएनजीबाबत असमधानी असल्याचेही त्यांनी सांगितले. बसस्थानकामधील हिरकणी कक्ष सुसज्ज करणे, कर्मचाऱ्यांसाठी राहण्याची सोय, गरम व थंड पाण्याची सोय यावर भर देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले.