रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात मागील कित्येक दिवस मान्सूनने हुलकावणी दिली होती. ऐन जूनच्या महिन्यात उन्हाळ्याचे वातावरण होते. अखेर आज रविवारी मान्सूनचे आगमन झाले आहे. रत्नागिरी शहरासह संगमेश्वर, राजापूर, हातखंबा, लांजा तालुक्यात पावसाने हजेरी लावली. तसेच चिपळुणात पावसाने दमदार हजेरी लावली, दुपारच्या सत्रात गडगडाटासह मान्सून चांगलाच बरसला. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाच्या हजेरीने रत्नागिरीकरसह शेतकरी सुखावला आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यात सलग तीन दिवस मान्सूनच्या पावसाने दमदार सलामी दिली. त्यानंतर पावसाने दडी मारलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा तापमान वाढले असून उष्मा, तापमानामुळे रत्नागिरीकर वैतागले होते. दुसरीकडे पाऊस न पडल्यामुळे पेरण्या ही खोळंबल्यामुळे शेतकरी चिंतेत होता. जिल्ह्यातील नदी, धरणातील पाणी पातळी कमी झाली आहे. शेतकरीसह नागरिक पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत होते. अखेर सकाळी आणि दुपारच्या सुमारास रत्नगिरीसह इतर तालुक्यांत मान्सूनचे पुन्हा आगमन झाले.
पावसाने तुरळक हजेरी लावल्यामुळे थोडासा का होईना नागरिक, बळीराजाला मिळाला आहे. दिवसभर ढगाळ वातावरण होते आणि घामापासून ही दिलासा मिळाला. दरम्यान, २२ ते २४ जूनपर्यंत जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला असून येत्या काही दिवसांत मान्सूनचे जोरदार आगमन होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
तब्बल १६ दिवस अडखळलेला मान्सून रविवारी (दि. २० जून) सक्रिय झाला. राज्यातील बहुतांश भागांत हलक्या ते मध्यम पावसाने रविवारी हजेरी लावली. या पार्श्वभूमीवर २२ ते २७ जूनदरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बारामती-सोलापूरजवळ अडखळलेला मान्सून २३ जून रोजी पुण्यात येण्याची शक्यता आहे.