रत्नागिरी : जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे महावितरणच्या वीज वितरणचे सुमारे पावणेपाच कोटींचे नुकसान झाले आहे. या आपत्कालीन परिस्थितीत एकूण १ लाख ६२ हजार ८१२ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या अधिकारी, अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्तीची कामे केल्यामुळे १ लाख ५४ हजार २५९ ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
रत्नागिरी विभागामध्ये १८५ उच्चदाब खांब बाधित झाले असून त्यापैकी १६४ खांब पूर्ववत करण्यात आले आहेत. ५८४ लघुदाब खांबांपैकी ५०६ खांबांची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. तसेच ३७ रोहित्रांपैकी २७ रोहित्रे पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहेत. या विभागात एकूण सुमारे १ कोटी ७९ लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
चिपळूण विभागामध्ये ६६ उच्चदाब खांबांपैकी ४६ खांब आणि २१० लघुदाब खांबांपैकी १६८ खांब पूर्ववत करण्यात आले आहेत. २० रोहित्रांपैकी १६ रोहित्रे सुरू करण्यात आली असून या विभागामध्ये सुमारे ६५ लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. खेड विभागामध्ये ३१० उच्चदाब खांबांपैकी १७०, तर ५९३ लघुदाब खांबांपैकी ३८३ खांबांची दुरुस्ती पूर्ण करण्यात आली आहे. २७ रोहित्रांपैकी १९ रोहित्रे पुन्हा सुरू करण्यात आली असून सुमारे २ कोटी १७ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.