रत्नागिरी : राज्य शासनाने या वर्षीपासून मोफत गणवेश योजनेच्या अंमलबजावणीसाठी नवीन निकष लागू केले आहेत. नवीन निकषानुसार प्रतिविद्यार्थी दोन गणवेशासाठी ६०० रूपयेप्रमाणे निधी येणे अपेक्षित होते मात्र एका गणवेशासाठी केवळ २४० रूपयांप्रमाणे निधी आले आहे. एकाच गणवेशासाठी तोकडा निधी आल्यामुळे दुसरा गणवेश कसा द्यावा असा प्रश्न, शिक्षक, मुख्याध्यापकांसमोर पडला आहे. पहिला गणवेश विद्यार्थ्यांना शाळेत वितरीत करण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा अभियान व राज्य शासनाकडून इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व पात्र मुली, अनुसूचित जाती-जमातीमधील मुले आणि दारिद्र्यरेक्षेखालील पालकांच्या मुलांना मोफत गणवेश योजनेचा लाभ दिला जातो. जिल्ह्यात गणवेश वितरणाच्या नियमात बदल केला आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी पात्र विद्यार्थ्यांना गणवेश दिले जाणार होते. दरम्यान, पहिल्याच दिवशी पात्र विद्यार्थ्यांना गणवेश दिले आहे. शासनाकडून ३०० रूपये देण्यात येतात मात्र २४० रूपयाप्रमाणे १ कोटी ४५ लाख १४ हजार २४० रूपये मिळाले आहेत. तीही रक्कम पूर्ण आलेली नाही. दुसऱ्या गणवेशासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे शासन मोफत गणवेशासाठी उर्वरित रक्कम पाठवणार का, त्याच पैशात दुसरे गणवेश द्यावे लागणार याचे चित्र लवकरच स्पष्ट होईल.
दरम्यान, ६० हजार ४७६ गणवेशासाठी पात्र लाभार्थी आहेत. एका गणवेशासाठी ३०० रूपये अपेक्षित असताना २४० रूपये आले आहेत. उर्वरित ६० रूपयाप्रमाणे ३६ लरच २८ हजार ५६० रूपये येणे बाकी आहे. शिवाय दुसऱ्या गणवेशाची पूर्ण रक्कमही आलेली नाही.
जिल्ह्यात एकूण ५ लाख ८६ हजार ३४० पुस्तके मंजूर असून त्यापैकी ५ लाख ७ हजार ४२४ पुस्तके आली असून पहिल्या दिवशी पुस्तके वितरतीत करण्यात आली आहे. आतापर्यंत ८६.५४ टक्के पुस्तके वितरीत झाली आहे. उर्वरित ७८ हजार ९१६ पुस्तके अद्याप आलेली नाहीत. लवकरच पुस्तके येणार असून आल्यानंतर ही पुस्तके वाटप होईल असेही सांगण्यात आले.