रत्नागिरी : जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण कमी आहे. कुपोषित बालके आढळण्याच्या प्रमाणात राज्यात शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आपला जिल्हा आहे. जिल्ह्यात ३४ कुपोषित बालके असून कुपोषणमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन काम करणार आहे. त्यासाठी डीपीसीमधून निधी देणार आहे. कुपोषित बालकांचे पालकत्व जि.प. सदस्य घेणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
पालकमंत्री सामंत यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात आरोग्य, शाळा दुरुस्तीसाठी बैठक घेतली. यावेळी अध्यक्ष अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर, समाजकल्याण सभापती सुयोग कांबळे, कृषी सभापती महेंद्र नाटेकर आदी उपस्थित होते. सामंत म्हणाले, कुपोषित बालके कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन चांगले काम करीत आहेत. जेथे ६५२ मध्यम प्रकारची कुपोषित बालके आहेत. त्या भागातील जिल्हा परिषदेच्या ५७ सदस्यांनी कुपोषित बालकांचे पालकत्व घ्यावे. वर्षभराच्या आत ५० टक्क्यांपेक्षा कमी प्रमाण करण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी १० प्राथमिक आरोग्य केंद्र स्मार्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी १० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
मानसिकतेमुळे शाळा बंद
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या २५० वर्गखोल्या नव्याने बांधण्याचा निर्णय आम्ही बैठकीत घेतला आहे. १५ ते २० कोटी रुपये देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेला देण्याचा निर्णय घेतला असल्याचे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले. काही शाळा दुरुस्ती झाल्या आहेत. तर काही राहिल्या आहेत. त्या लवकर होतील. ज्या शाळा बंद झाल्या आहेत त्या पटसंख्येअभावी बंद झाल्या नसून पालकांच्या मानसिकतेमुळे शाळा बंद झाल्या आहेत, असेही पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.