पावस : रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे लिंगायतवाडी व खोताचीवाडी यादरम्यानच्या पुलाजवळील उभ्या लोखंडी पाईपमधील गाळ हटवत असताना, स्लॅब कोसळून या कामावरील सुपरवायझर अक्षय शिवाजी काटे (वय २६) त्यात दबला गेला व त्याचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत दोन कामगार व चार ग्रामस्थ सुदैवाने बचावले.
या परिसरातील लिंगायतवाडी खोताचीवाडी, फडकेवाडी आदी परिसरातील शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ यांना पावसाळ्यामध्ये ये-जा करण्यासाठी लोखंडी साकव बांधण्यात आला होता, परंतु तो नादुरुस्त झाल्यामुळे गेली दोन वर्षे या मार्गावरील पावसाळ्यातील वाहतूक ठप्प झाली होती. सोमवारी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. मोठ्या प्रमाणात कचरा या पुलाच्या लोखंडी खांबांना अडकून राहिल्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला होता. याची माहिती मिळाल्यानंतर सुपरवायझर अक्षय शिवाजी काटे व त्याचे दोन कामगार सकाळी कामाच्या ठिकाणी हजर झाले आणि पुलाच्या सेंट्रींगसाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी पाईपना अडकलेला गाळ काढण्यास सुरुवात केली. अक्षय काटे अडकलेला गाळ काढत असताना लावण्यात आलेली लोखंडी पाईप सटकल्याने पुलाच्या एका भागाचा स्लॅब संपूर्णपणे काटे यांच्या अंगावर पडला.
पंधरा दिवसांपूर्वीच टाकला होता स्लॅब
याठिकाणी साकव योजना कार्यक्रमांतर्गत ५५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. त्याचे एप्रिल महिन्यामध्ये भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली होती, परंतु संथगतीने काम सुरू असल्यामुळे पंधरा दिवसांपूर्वीच पुलाच्या कामाचा स्लॅब टाकण्यात आला होता.