खेड : कोकण म्हटलं की आंबा, काजू आणि कोकम हीच प्रमुख ओळख. मात्र बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील शेतीत नवे प्रयोग करण्याची गरज निर्माण झाली असताना खेड तालुक्यातील वेरळ येथील प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फ आप्पा कदम यांनी सफरचंद लागवडीचा यशस्वी प्रयोग करून कोकणातील शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
सामान्यतः थंड हवामानासाठी प्रसिद्ध असलेल्या काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तर भारतातील डोंगराळ भागात सफरचंदाचे उत्पादन घेतले जाते. मात्र आता कोकणातील उष्ण व दमट हवामानातही सफरचंदाची लागवड यशस्वी होऊ शकते, हे आप्पा कदम यांच्या प्रयोगातून सिद्ध झाले आहे.
आप्पा कदम यांनी आपल्या शेतामध्ये ‘अॅना’ (Anna) या उष्ण प्रदेशासाठी उपयुक्त मानल्या जाणाऱ्या सफरचंद जातीची तब्बल शंभरहून अधिक झाडे लावली आहेत. विशेष म्हणजे या झाडांना सध्या लहान-लहान सफरचंदेही लागले असून त्यांची वाढ चांगल्या प्रकारे होत आहे. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
गेल्या काही वर्षांपासून हवामान बदलाचा मोठा फटका कोकणातील आंबा उत्पादकांना बसत आहे. अवकाळी पाऊस, वाढते तापमान आणि बदललेले ऋतुचक्र यामुळे आंबा उत्पादनात लक्षणीय घट होत असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत पारंपरिक पिकांबरोबरच पर्यायी फळबागांची गरज अधोरेखित होत आहे. याच पार्श्वभूमीवर सफरचंदासारख्या उच्च मूल्य असलेल्या फळाची लागवड कोकणात यशस्वी होणे ही शेतकऱ्यांसाठी आशादायी बाब मानली जात आहे. बाजारात सफरचंदाला वर्षभर मोठी मागणी असून त्याला चांगला दरही मिळतो. त्यामुळे भविष्यात कोकणातील शेतकऱ्यांसाठी सफरचंद लागवड उत्पन्नाचा एक नवा आणि फायदेशीर पर्याय ठरू शकतो.
आप्पा कदम यांनी केलेला हा प्रयोग केवळ त्यांच्या शेतापुरता मर्यादित नसून कोकणातील शेतीच्या बदलत्या वाटचालीचे प्रतीक ठरत आहे. योग्य जातींची निवड, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रयोगशील वृत्ती यांच्या जोरावर कोकणातील शेतकरी पारंपरिक चौकटीबाहेर जाऊन नवीन पिकांमध्ये यश मिळवू शकतात, याचा हा उत्तम नमुना आहे. सफरचंद लागवडीचा हा यशस्वी प्रयोग पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी उत्सुकता दाखवत असून कृषी क्षेत्रातही या प्रयोगाची चर्चा सुरू झाली आहे. आगामी काळात अशा प्रकारचे प्रयोग वाढल्यास कोकणाची ओळख केवळ आंब्यापुरती मर्यादित न राहता विविध उच्च मूल्य फळपिकांचे केंद्र म्हणूनही निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
"आंब्यासोबत सफरचंदही... कोकणातील शेतीला नवी दिशा देणारा वेरळचा प्रयोग" अशीच चर्चा सध्या कृषी क्षेत्रात रंगू लागली आहे. वेरळ येथील प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फ आप्पा कदम यांच्या शेतामध्ये सफरचंदाची यशस्वी लागवड ही कोकणातील शेतकऱ्यांसाठी आदर्श चांगला पर्याय होऊ शकतो. विशेष म्हणजे थंड प्रदेशातील मक्तेदारी असलेले हे सफरचंद कोकणात अगदी 45 अंश सेल्सिअस चा तापमानात देखील उत्पन्न देऊ शकते. कोकणातील एक नवी क्रांती घडेल अशी माहिती फळबाग तज्ञ नेत्राली पाटणे - गांगण यांनी दिली आहे.