दापोली : दापोली तालुक्यातील आंजर्ले येथे मंगळवारी (दि. १४) रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयाजवळ पार्किंगसाठी उभ्या करण्यात आलेल्या मासेमारी बोटींना भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत दोन ते तीन बोटींना आग लागली आहे. आणि आणखी काही बोटी धोक्यात आल्या आहेत. ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सध्या पावसाळ्यामुळे मासेमारी हंगाम बंद असल्याने आंजर्ले खाडीलगत अनेक मासेमारी बोटी सुरक्षिततेच्या दृष्टीने किनाऱ्यावर उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. त्यापैकी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ पार्किंग केलेल्या बोटींना अचानक आग लागली. आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी धावले. आग इतर बोटींमध्ये पसरू नये म्हणून त्यांनी जीवाची पर्वा केली नाही. तसेच उपलब्ध साधनांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले.
या आगीत जळालेल्या बोटींचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आग लागण्याचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेमुळे आंजर्ले परिसरातील बोटमालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या बोटी नेमक्या कुणाच्या मालकीच्या आहेत, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.