रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ५२ हजार ४७६ हेक्टर क्षेत्रांवर भात व नाचणीच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यापैकी जिल्ह्यात ६ हजार ९०८ हेक्टर क्षेत्रांवर भात लावणी झाली आहे. आतापर्यंत १० टक्के भाताची पुनर्लागवड झाली आहे. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर असाच राहिल्यास भात लावणी पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले.
राज्यासह कोकण विभागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जुलै महिन्यात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, भरपावसात तसेच काहीसा पाऊस थांबल्यानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून भात लावणीला मोठा वेग आला आहे. भात, नाचणीसह विविध पिकांच्या पेरण्यासाठी शेतातील कामास सुरूवात झाली आहे.
जिल्ह्यात तब्बल ६ हजार ९०८ हेक्टर क्षेत्रांवर भात लावणी झालेली आहे. यामध्ये सर्वाधिक भात लावणी राजापुरात १,४५० हेक्टर, संगमेश्वर तालुक्यात १,४५० हेक्टर, तर सर्वात कमी मंडणगड २४८ हेक्टर, दापोली २५० हेक्टर क्षेत्रांवर भाताची पुनर्लागवड झाली आहे. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर पुन्हा वाढणार असून उर्वरित भात लावणीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जोर लावला आहे. मात्र सर्व लावण्या एकदम सुरू झाल्याने मनुष्यबळ कमी पडत असल्याचे सांगण्यात आले.