रत्नागिरी : शहराला पाणी पुरवठा करणारी नवीन पाईपलाईनला पुन्हा गळती लागली असून, मारुती मंदिर परिसरात दोन ठिकाणी उत्खनन करुन ही गळती काढण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरु होते. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात होते. नवीन जलवाहिनी फुटण्याचे प्रमाण वाढले असल्याने नगर परिषदेला यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
कोट्यवधी रुपये खर्च करून रत्नागिरी शहरासाठी नवीन नळपाणी योजना राबवण्यात आली. मात्र या योजनेची मुख्य वाहिनीला वारंवार गळती लागत आहे. अनेकदा दुरुस्त करुनही या वाहिनीचा गळती लागण्याचा प्रश्न सुटलेला नाही. शहरातील मारुती मंदिर परिसरात साक्षी फुड व महालक्ष्मी मार्टच्या समोर दोन ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा मोठ्याप्रमाणात जमिनी खालून निचरा होत होता. रस्त्याच्या उंचीपासून खालील बाजूला असणाऱ्या दुकानदारांच्या दुकानांजवळ हे पाणी निचरत होते. त्यामुळे हा प्रकार उघड झाला. सोमवारी दोन ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने खणण्यात आल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर पाईपलाईनच्या दिशेने चर खणण्यात आला. सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत पाईपची गळती काढण्याचे काम कर्मचाऱ्यांकडून सुरू होते. याच दरम्यान, मोठ्याप्रमाणात पाणी वाया जात असल्याचेही लक्षात आले. सायंकाळीपर्यत दोन्ही ठिकाणी गळती काढली जाईल असे नगर पालिकेतर्फे सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वी गोगटे जोगळेकर महाविद्यालयासमोर पाईप फुटून मोठ्याप्रमाणात पाणी वाया गेले होते. त्यामुळे राजिवडा व खडपेवठार येथे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.