गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी धरणाच्या बांधकामाचा शुभारंभ 1979 साली करण्यात आला. पाईपलाईनचे काम याआधीच करण्यात आले होते. प्रत्यक्ष जयगड प्रादेशिक नळपाणी योजना 1986 पासून सुरू करण्यात आली. त्यावेळी या धरणातील पाण्याचा साठा शून्य म्हणजेच 0.346 एम.सी.यू.एम.एवढा उपलब्ध होता.
या धरणाची लांबी 165मीटर, उंची 65 मीटर होती. प्लाकिंग करून 8 ते 9 फूट उंची प्लाकींगने उन्हाळ्यात वाढवावी लागत होती. धरणातील गळती मुळे नदीतून वाहून जाणारे पाणी परत 30 एच.पी. पंपाने परत धरणात फेकले जात होते. जयगड प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली तेव्हा फक्त 7 ते8 गावांचा समावेश होता.त्यावेळी 75 एच.पी. पंप 20ते22 तास चालू ठेवले जात होते. कालांतराने पाण्याची सोयी सुविधा विस्तारली गेली. जुने पंप, जुनी पाईप लाईन यात सातत्याने बिघाड होऊ लागले आणि आजच्या घडीला 27 गावांना पाणी पुरवठा योजना सुरळीत चालवण्याची फार मोठी तारेवरची कसरत ग्रामीण पाणीपुरवठा विभागला करावी लागत असे.आज घडीला या धरणातून दिवसाला 25 ते 30 लाख लिटर पाणी पुरवठा करण्यात येतो.
या निसर्गरम्य कळझोंडी धरण येथे सुमारे दोन एकर क्षेत्रावर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी स्वखर्चाने येथे उत्पन्न देणारी आंबा, नारळ, सुपारी, काजू, केळी, फणस तसेच विविध फूल झाडे, विविध रंगांची, फुलांची, देखणी बाग,आज ही उत्तम प्रकारे फुलवण्यात आली आहे. सन 2022-23,23-24 या दोन वर्षांत या कळझोंडी धरणाची उंची वाढवणे व जॅकेटिंग व ग्राऊटिंग करणे हे काम अतिशय उत्तम प्रकारे झाल्याने या धरणाची उंची वाढली असून पाण्याच्या साठ्यात दुपटीने वाढ झाली आहे चालू वर्षी या पाण्याच्या साठ्यात 0.698 एम.सी.यु.एम. एवढी वाढ झाल्याने या धरणाला आता प्लाकींगची आवश्यकता नाही.
भरमसाठ पाणी साठ्यात वाढ झाल्याने या जयगड प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेतील लाभार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. परंतु नवीन जॅकवेलमधून नवीन पाईप लाईन द्वारे पाणी पुरवठा लवकरात लवकर सुरळीत सुरू करावा, अशी आग्रही मागणी तमाम लाभार्थी वर्गाने वारंवार केली आहे. कोकणातील गणपतीपुळे वरवडे मालगुंड नजीकच असलेल्या निसर्गमय कळझोंडी विकसित धरणाला पर्यटन क्षेत्र म्हणून दर्जा द्यावा अशी मागणी ग्रामस्थ प्रवासी व पर्यटक यांनी केली आहे.खर्या अर्थाने या निसर्गरम्य धरण परिसराचा पर्यटनात्मक विकास करण्याकडे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पुरवठा विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग आदींनी कटाक्षाने व गांभीर्याने लक्ष घालावे असे मत संपूर्ण कळझोंडी गाववासीयांकडून व्यक्त होत आहे.