रत्नागिरी : रक्षाबंधनानिमित्त माहेरी जाणाऱ्या लाडक्या बहिणींचा प्रवास चांगला व सुखकर होण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने जादा बसेसचे नियोजन केले आहे. रत्नागिरी विभागातून २८, २९ आणि ३० ऑगस्ट दरम्यान तब्बल ३० ते ३५ एसटी बसेसची सोय केली आहे. गर्दी वाढल्यास आणखीन फेऱ्या वाढवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
रक्षाबंधनानिमित्त आपल्या लाडक्या भावाला राखी बांधण्यासाठी प्रत्येक लाडकी बहीण आपल्या माहेरी जाते किंवा काहीजण पोस्टाने राख्या पाठवतात. जे वेगळ्या जिल्ह्यात राहतात ते आपल्यामुळ गावी येत असतात. २९ ऑगस्ट रोजी शनिवार आणि ३० ऑगस्ट रोजी रविवार अशी सलग सुट्टी येत असल्यामुळे रक्षाबंधनासाठी गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. ग्रामीण तसेच शहरी भागांतून एस.टी. बसस्थानकांवर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. तरी प्रवाशांनी जास्तीत जास्त ऑनलाईन किंवा ऑफलाईन बुकिंग करावे, असे आवाहन करण्यात आले.
गर्दीच्या मार्गावर जादा फेऱ्या
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतून ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर तसेच मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, अक्कलकोट, विदर्भ भागात प्रवाशांची मागणी अधिक असते. गर्दीच्या वेळेत प्रवाशांना बस उपलब्ध व्हावी, यासाठी जादा बसेस सोडण्यात येतील.
रक्षाबंधनानिमित्त रत्नागिरी विभागातून सलग तीन दिवस ३० ते ३५ एसटी बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवाशांची गर्दी वाढल्यास आणखीन बसेस वाढवण्यात येईल. लाडक्या बहिणींचा प्रवास सुरक्षित व सुरळीत होण्यासाठी एसटी प्रशासन सज्ज आहे.- आश्वजित जानराव, विभाग नियंत्रक, रत्नागिरी