रत्नागिरी : जिल्ह्यात मान्सूनने दमदार हजेरी लावली आहे. रविवारी तुरळक, तर सोमवारी आणि मंगळवारी जिल्ह्यात पावसाने दमदार बॅटिंग केली. दोन दिवसांत ४९० मि.मी. इतका पाऊस पडला आहे. पावसामुळे बळीराजा सुखावला असून, दुबार पेरणीचे संकट टळले आहे. दरम्यान, सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे लांजा तालुक्यातील आरगाव बौद्धवाडी येथील मुकुंद कदम यांच्या घराची संरक्षक भिंत कोसळून कल्पना यद्रे यांचा सोमवारी ४.३० वाजता मृत्यू झाला. पहिल्याच पावसातील जिल्ह्यातील हा पहिला बळी ठरला आहे.
मागील २० दिवसांपासून कोकणात पावसाने उसंती घेतल्यामुळे धरण, नद्यांची पाणीपातळी कमी झाली होती. जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली होती. शेतकरी, नागरिक चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत होती. अखेर वरुणराजाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे बळीराजासह नागरिक सुखावले आहेत. सर्वाधिक पाऊस रत्नागिरी, गुहागर, राजापुरात झाला, तर सर्वात कमी मंडणगड तालुक्यात पडला आहे. रविवारी रत्नागिरी, राजापूर, लांजा, संगमेश्वर, चिपळुणात तुरळक पाऊस झाला. त्यानंतर सोमवारी पावसाने सर्वच तालुक्यांत तुफान बॅटिंग केली. त्यानंतर मंगळवारी एकाच दिवशी तब्बल ४१९ मि.मी. इतका पाऊस झाला. रात्रभर आणि दुपारपर्यंत पावसाने हजेरी लावली. त्यानंतर दुपारी ३ च्या सुमारास पावसाने विश्रांती घेतली. सायंकाळी आणि रात्रीच्या सुमारास पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली.
१ ते २३ जूनदरम्यान १०९३ मि.मी. पाऊस
रत्नगिरी जिल्ह्यात १ ते २३ जून दरम्यान १०९३ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. तर सरासरी १२१.४९ मि.मी. इतका पडला आहे. त्यामध्ये सर्वाधिक रत्नागिरी, गुहागरात पडला आहे. तर गतवर्षी जून २३ दरम्यान ६ हजार ५१५ मि.मी. पाऊस झाला होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल साडेपाच हजार मि.मी. पाऊस कमी पडला आहे.