रत्नागिरी ः काही दिवसांपूर्वी झरेवाडी येथून बेपत्ता झालेल्या विवाहितेचा मृतदेह मंगळवार 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा. सुमारास पानवल येथील धरणात आढळून आला. मालती गजेंद्र कळंबटे (वय 33, रा. झरेवाडी हातखंबा, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. विवाहिता मानसिक रुग्ण असून तिचे वडीलही मानसिक रुग्ण आहेत. पतीपासून विभक्त झाल्यानंतर ती वडिलांच्याच घरी रहात होती. रविवार 29 सप्टेंबर रोजी वडिलांसोबत झालेल्या भांडणामुळे ती घरात कोणालाही न सांगता निघून गेली होती.
याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात बेपत्ता म्हणून नोंद करण्यात आली होती. तीचा सर्वत्र शोध सुरू असताना मंगळवारी सकाळी 11 वा. सुमारास पानवल धरणाच्या खाली प्रवाहात तिचा मृतदेह तेथील स्थानिकांना आढळला. या बाबत ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.