चिपळूण : चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती (रजिस्टर)चिपळूण व मुंबई यांच्या वतीने संस्थेचा ८५ वा वर्धापन दिन आणि खेर्डी (ता. चिपळूण) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या ऐतिहासिक खोतीविरोधी परिषदेच्या ८८ व्या वर्धापन दिनानिमित्ताने खेर्डी येथील हत्तीचा माळ (एमआयडीसी मध्ये ) येथे १६ मे रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐतिहासिक खोती विरोधी परिषदेच्या ठिकाणी परिषदेच्या स्मृतिप्रीत्यर्थ भव्य असा क्रांतिस्तंभ उभारण्याची तसेच या परिसरात संविधान भवन उभारण्याची मागणी या निमित्ताने करण्यात आली आहे. दिवसभर चालणाऱ्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती मुंबईचे अध्यक्ष विठोबा पवार हे भूषवणार असून स्वागताध्यक्ष म्हणून संस्थेचे स्थानिक अध्यक्ष चंद्रकांत सावंत उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत, गुहागरचे आमदार भास्कर जाधव, चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम, चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ, चिपळूण पं. स. सभापती सूर्यकांत खेतले, माजी आमदार रमेश कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, रत्नागिरी जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. तानाजीराव चोरगे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव उपस्थित राहणार आहेत.
त्यांच्यासमवेत विशेष निमंत्रित म्हणून खेर्डी जि. प. सदस्य रावी मोरे, खेर्डी पं. स. सदस्य विनोद भुरण, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी तालुकाध्यक्ष जयेंद्रथ खताते, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, पं. स. सदस्य सुभाष जाधव, नगरसेविका निलिमा जाधव, ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते, ज्येष्ठ विचारवंत प्रा. विजय मोहिते, रत्नागिरी जिल्हा बौद्धजन महासंघ मुंबईचे सभापती वि. ल. मोहिते, कुणबी समाजातील पुरोगामी नेते काका जोशी, ज्येष्ठ सामाजिक राजकीय कार्यकर्ते विवेक पवार, संस्थेचे सरचिटणीस संदेश पवार उपस्थित राहणार आहेत.
सकाळी ११:१५ ला पाहुण्यांचे स्वागत, प्रास्ताविक, खोती विरोधी पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता खोतीविरोधी परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सहकार्य करणाऱ्या तत्कालीन बेंडके, बर्वे, कोवळे, भडवळकर कुटुंबीयांचा तथा त्यांच्या वंशाचा सत्कार करण्यात येणार आहे. दुपारी १२ ते १ पाहुण्यांचे मार्गदर्शन होणार आहे. तदनंतर दुसरे सत्र परिसंवादाचे असेल. दुपारी २ वाजता खोतीविरोधी परिषदेचे ऐतिहासिक महत्त्व व समकालीन बेदखल कुळांचा प्रश्न या विषयावरील परिसंवाद हरिश्चंद्र पवार (सरचिटणीस) यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून त्यामध्ये प्रा. विजय मोहिते, युवराज मोहिते, काका जोशी, संदीप येलये, प्रकाश साळवी, संतोष कुळे आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.