खेड : तालुक्यातील कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयातील प्रशासनिक निष्क्रियतेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर रुग्णालयातील जनरेटर सुरू न झाल्याने पोस्टमार्टमसाठी आणलेला मृतदेह तब्बल तीन तास अंधारातच पडून राहिला.
24 रोजी रात्री तळवट पाली येथून मृतदेह रुग्णालयात आणण्यात आला होता. मात्र, त्याचवेळी वीजपुरवठा खंडित झाला. रुग्णालयात दोन जनरेटर असतानाही एक बंद अवस्थेत होता, तर दुसऱ्यासाठी डिझेल उपलब्ध नसल्याने तोही सुरू होऊ शकला नाही. परिणामी, संपूर्ण रुग्णालय अंधारात बुडाले. या घटनेमुळे गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, जर त्याच वेळी आपत्कालीन शस्त्रक्रिया किंवा प्रसूतीची वेळ आली असती, तर रुग्णांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला असता, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
घटनेनंतर नागरिक व सामाजिक संघटनांनी संताप व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाईची मागणी केली आहे. ‘उपजिल्हा रुग्णालय’ ही केवळ नावापुरतीच मर्यादित राहिली आहे का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.