खेड : अनुज जोशी
मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील कशेडी बोगद्यतून वाहतुकीसाठी परवानगी दिल्यानंतर पहिल्याच पावसाळ्यात त्यामध्ये पाण्याच्या धारा लागल्याने धोकादायक बनला आहे. बोगद्यात पाच ते सह ठिकाणी मोठ्या प्रमाणात डोंगरातून पाझर लागला असून त्याकडे तातडीने लक्ष न दिल्यास मोठा अनर्थ ओढवू शकतो.
कशेडी बोगद्यातून लहान वाहनांनी प्रति तास ३० किलोमीटर मर्यादा घालण्यात आली आहे. परंतु काही ठिकाणी धबधब्यासारखे पाणी छतातून कोसळत असल्याने प्रवाशांच्या उरात त्यामुळे धडकी भरत असून वेगाने बोगदा पार करण्यासाठी वाहनचालक वेगाची मर्यादा पळताना दिसत नाहीत.
बोगद्यातून वाहतूक सुरू झाल्या नंतर हा पहिलाच पावसाळा आहे. त्यातच आता कशेडी भोगद्यात पाण्याचे फवारे उडत असल्याने भितीचेही वातावरण आहे. कशेडी बोगद्यामध्ये वरील भागातून पडत असलेले पाणी वाहनांवर किंवा दुचाकी चालकांवर पडू नये, याची खबरदारी घेतली जात असून त्याचा निचरा बोगद्यातील लगतच्या गटारातून होण्यासाठी उपाययोजना सुरू आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे तांत्रिक सल्लागार श्री. धर्माधिकारी व आय. आय. टी. मुंबई येथील तज्ज्ञांनी बोगद्याच्या पाहणी केली असून त्यांनीही तूर्तास कोणताही धोका नसल्याचे सांगितले आहे. केवळ पाणी योग्य पद्धतीने बाहेर काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी 'पुढारी'सोबत बोलताना दिली.