गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी धरणातून होत असलेल्या दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्याच्या तक्रारींनंतर उदय सामंत यांच्या आदेशानुसार लोकप्रतिनिधींनी तातडीने धरण व संबंधित पाणीपुरवठा यंत्रणेची पाहणी केली. या पाहणीनंतर प्रशासनाने त्वरित सुधारणा उपाययोजना सुरू केल्या असून, पाणी नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
कळझोंडी धरणाबाबत “दूषित पाणीपुरवठ्यामुळे आरोग्य धोक्यात” असल्याच्या बातम्या विविध माध्यमांत प्रसिद्ध झाल्यानंतर आणि उद्योजक प्रभाकर (काका) मुळ्ये यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासन सतर्क झाले. यानुसार जिल्हा परिषद सदस्या उषा सावंत, पंचायत समिती सदस्या अनुष्का खेडेकर आणि उपतालुकाप्रमुख अभय खेडेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धरणाला भेट देत प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणीकेली.
पाहणीदरम्यान धरणातील पाण्यात झाडी, झुडपे, पाला-पाचोळा कुजून मिसळल्यामुळे पाणी दूषित होत असल्याची शक्यता व्यक्तकरण्यात आली. तसेच गढूळ पाणी थेट पंपहाऊसकडे सोडले जात असल्याने आणि विहिरीला नैसर्गिक झरे नसल्यामुळे पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचेही निदर्शनास आले. उपस्थित लोकप्रतिनिधींनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी जयगड प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेंतर्गत असलेल्या “शांतीसागर जलकुंभ” साठवण टाकी, नव्याने बांधलेली पाण्याची टाकी आणि फिल्टर यंत्रणांचीही पाहणी करण्यात आली. संबंधित ठेकेदार, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग आणि जीवन प्राधिकरण विभागाशी संपर्क साधून तातडीने दुरुस्ती व शुद्ध पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याचे आदेश देण्यात आले.
दरम्यान, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले असून लवकरच अहवाल सादर केला जाणार आहे. तसेच कळझोंडी येथील 6 लाख लिटर क्षमतेची टाकी आणि एक लाख लिटरच्या दोन टाक्यांची स्वच्छता कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे. उद्योजक प्रभाकर (काका) मुळ्ये यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे प्रशासनाने तातडीने पावले उचलली असली, तरी आता प्रत्यक्षात नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा होतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.