रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसीतील जे. के. फाईल्स ते गद्रे मरीनपर्यंतच्या रस्त्याच्या स्थितीबाबत ओरड होत असताना, हायवेपासून एमआयडीसीत जाणारा हा मुख्य रस्ता आता चौपदरीकरण केला जाणार आहे. यासाठी सुमारे २४ कोटीचा निधी मंजूर झाला असून या चौपदरीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली आहे. मार्च २०२७ पर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे.
शहरालगतच्या मिरजोळे एमआयडीसीमध्ये जाण्यासाठी जे. के. फाईल्स येथून मुख्य रस्ता असून, पाऊस व अवजड वाहतुकीमुळे येथील रस्त्याला खड्डे पडले आहेत. याच्या डागडुजीबाबत नागरिकांकडून मागणी होत आहे. मात्र जे.फे. फाईल्स ते गद्रे मरीन कंपनीपर्यत या रस्त्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे. सुमारे अठराशे मीटरचा हा रस्ता असून २४ कोटी रुपये खर्च करुन हे काम होत आहे. या कामाला पहिल्या टप्प्यात सुरुवातही झाली असून, रस्त्याच्या बाजूने पाण्याची पाईपलाईन व वीज वाहिन्या हलवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. चौपदरीकरण करताना रस्त्याच्या मध्यभागी डिव्हाडरवर आकर्षक झाडे लावली जाणार असून, विद्युत दिवेही लावण्यात येणार आहेत. काँक्रीटीकरणासह दोन्ही बाजूंनी फुटपाथ, गटारे आदी कामेही होणार आहेत.
जागतिक पातळीवर निर्यात करणार्या गद्रे मरीनसह अनेक मरीन कंपन्यांची वाहतूक या मार्गावरुन होत असते. तटरक्षक दलासह या मार्गाजवळच इंजिनिअरींग व पदवी महाविद्यालयही आहे. नव्याने होऊ घातलेले रत्नागिरी विमानतळासाठीही हा शहरात येण्यासाठी किंवा रत्नागिरीतून बाहेर पडण्यासाठी हायवेला जाण्यासाठी मुख्यमार्ग असणार आहे. त्यामुळे या रस्त्याचे चौपदरीकरण करतानाच तो आकर्षक दिसावा यासाठी एमआयडीसीकडून प्रयत्न सुरु आहेत.