रत्नागिरी : संदेशवहन अथवा दळणवळणाच्या क्षेत्रात झालेले बदल लक्षणीय आहेत. टेलिफोन, मोबाईल, इंटरनेट, ई-मेल यासारख्या सुविधा उपलब्ध झाल्याने जग जवळ येऊ पाहत आहे. संदेशवहन जलदगतीने होऊ लागले आहे. परिणामी, भारतीय टपाल सेवेचे पत्र हा प्रकार दुर्मीळ झाला आहे.
सध्याचे युग हे गतिमान युग आहे. या गतिमान युगात मोबाईल यासारख्या संपर्क यंत्रणा मोठ्या प्रमाणात विकसित झाल्याने गावोगावी, चौकाचौकांत टांगलेल्या लाल रंगाच्या टपालपेट्या आता शोपीस बनत आहेत. प्रत्येकाचे नातेवाईक, परिचित माणसे वेगवेगळ्या गावात राहतात. या नातेवाईकांना निरोप देणे, आमंत्रण देणे यासाठी आता मोबाईलचा सर्रास वापर होत आहे.फार पूर्वी निरोप पाठवणारा माणूस पायी जात असे. कधी तो घोड्यावरून अथवा उंटावरून जात असे.
परंतु, इंग्रजांच्या काळात भारतात प्रथम टपाल व्यवस्था सुरू झाली. हीच टपाल सेवा होय. यामध्ये साध्या 50 पैशाच्या कार्डावर किंवा आंतरदेशीय पत्रावर मजकूर लिहून ते पोस्टाच्या पेटीत टाकले जाते. 2 ते 3 दिवसांनी तो निरोप त्या व्यक्तीला मिळत असे. फार पूर्वी निरोपाची देवाणघेवाण होण्यासाठी कबुतरांचाही वापर होत असे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक कामाच्यासंदर्भात आठ खाती तयार केली होती. त्याला अष्टप्रधान मंडळ असे नाव होते. त्यामध्ये पत्रव्यवहार सांभाळणे हे काम एखाद्या व्यक्तीला नेमून दिले जायचे आणि तो व्यक्ती आलेली पत्रे, आज्ञा, हुकूम इ. जपून ठेवणे किंवा एखाद्या राज्यात पत्र, आज्ञा किंवा आदेश घेऊन घोड्यावर बसून जात असे. यामध्ये बराच कालावधी जात असे व पत्रव्यवहाराची देवाणघेवाण होण्यात अडचणी यायच्या. त्यानंतर मात्र इंग्रजांनी व्यापाराच्या निमित्ताने भारतात पाय रोवले. हळूहळू आपला देश ताब्यात घेतला. इंग्रजांनीही रेल्वे, टपाल यासारख्या यंत्रणेचे महत्व लक्षात घेवून टपालसेवा सुरू केली.
टपालसेवेने पाठविलेल्या संदेशाला लगेच उत्तर मिळत नाही. ज्याला पत्र लिहले आहे त्याने उलट पत्र पाठविले तरच संदेशाची देवाणघेवाण योग्य होत असे. परंतु हे अतिशय अडचणीचे होते. या दरम्यान बराच वेळ जात असे. मात्र आता टेलिफोन, मोबाईल, इंटरनेट, ई-मेल यासारख्या सुविधा उपलब्ध झाल्याने जग जवळ येवू पाहत आहे. संदेशवहन जलदगतीने होवू लागले आहे.
जवळच्या किंवा दूरच्या अंतरावरील माणसाशी बोलताना टेलिफोन वापरतात. टेलिफोनवर प्रत्यक्ष बोलणे होते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचे समोरासमोर संभाषण झाल्याने पुढील क्रिया झटपट होतात. आता त्याहीपुढे जावून भ्रमणध्वनी अर्थात मोबाईलची निर्मिती झाली आणि विना लाईट, विना वायर असलेला मोबाईल खणाणू लागला.
पूर्वी सुरुवातीला फक्त आर्थिकदृष्ट्या धनवान असलेल्या व्यापारी, व्यावसायिक वा मोठी व्यक्तीच मोबाईल वापरायच्या. कारण सुरूवातीला त्याच्या किंमती अवाढव्य होत्या. परंतु, अलिकडे बर्याच मोठ्या खासगी कंपन्या येवू लागल्याने आपल्यालाच ग्राहक मोठ्या प्रमाणात मिळावेत यासाठी त्यांच्यात स्पर्धा सुरू झाली आहे त्यासाठी विविध योजना कंपनी जाहीर करते व अनेक ग्राहकांना आकर्षक योजना देऊन आपल्या मोबाईल कंपनीकडे आकर्षित करते.