चिपळूण : कोयना अभयारण्यात सोडलेल्या वाघांना कोकणातील निसर्गाची भुरळ पडली आहे. या अभयारण्यात सोडलेली ‘हिरकणी’ तब्बल दोन महिने कोकणातील चिपळूण परिसरात वास्तव्यास होती. अनेकवेळा वन विभागाने तिला पुन्हा कोयना अभयारण्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला. अखेर दोन महिन्यांनंतर ती पुन्हा एकदा आपल्या कोयना अभयारण्याच्या कार्यक्षेत्रात स्थिरावली. त्यासाठी तिला खास प्रयत्न करून वळवावे लागले. त्यामुळे वाघांना कोकणचा निसर्ग आवडल्याचे अधोरेखित झाले आहे.
११६५ चौ.कि.मी. परिसरातील सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पसरला आहे. सह्यद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येतो. त्यामुळे अनेकवेळा व्याघ्र प्रकल्पातील वाघ कोकणामध्ये येत असतात. आंबा घाटमार्गे, तर कधी कुंभार्ली घाटमार्गे त्यांचा कोकणामध्ये प्रवास घडतो. यावेळी तिने याच भागात शिकार केल्याचेही सांगण्यात येत आहे.
कोयना अभयारण्यात सोडलेला नर वाघ ‘एसटीआर 03’ अर्थात बाजी याच्या जोडीला ही ‘हिरकणी’देखील कोयना अभयारण्यात सोडण्यात आली. यानंतर या वाघिणीने कोयना अभयारण्यात आपला वावर सुरू केला आणि कालांतराने ही वाघीण पश्चिमेकडे अर्थात सह्याद्री पर्वत ओलांडून थेट कोकणात आली.
कोकणात प्रवेश
पेंच व्याघ्र प्रकल्पातून पीटीआर १२३ या क्रमांकाची वाघीण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आली. तिला ‘एसटीआर ०६’ हा शासकीय नंबर देण्यात आला, तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कर्मचार्यांनी तिला ‘हिरकणी’ हे नाव दिले. तिने नावाप्रमाणेच सह्याद्रीचा कडा ओलांडून कोकणात प्रवेश केला. तब्बल दोन महिने ती चिपळूण तालुक्याचा पूर्व विभाग पादाक्रांत केला.